अमोल कोल्हेंनी सांगितलं अजित पवारांच्या भेटीचं कारण; म्हणाले...

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाणं आलं होतं
अमोल कोल्हेंनी सांगितलं अजित पवारांच्या भेटीचं कारण; म्हणाले...

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडली. यानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. या दोन्ही गटांकडून आम्ही खरी राष्ट्रवादी आहोत असा दावा केला गेला. आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर याबाबतचा खटला सुरु आहे. असं असताना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाणं आलं होतं. यावर आता कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड होण्यापूर्वी अमोल कोल्हे हे सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार यांच्या निवासस्थानी होते. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर मात्र अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता अचानक अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होत्या. यानंतर अमोल कोल्हे यांनी मतदार संघातील विकासकामांबद्दल ही भेट असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, "शिरुर मतदार संघाच्या दृष्टीने दोन महत्वाचे प्रकल्प आहेत. मंत्री मंडळाच्या मंजुरीमुळे पुणे-नाशिक रेल्वेचा प्रकल्प रखडला आहे. तर इंद्रायणी सेडिसीटी सारखा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प, ज्यात २६ रुग्णालये एक छताखाली एकत्र आणत आहोत. या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकार असतानाही अजित पवार यांची महत्वाची भूमिका होती. हे प्रकल्प पुढे नेण्याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा केली. "

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने राष्ट्रवादीतील खासदारांना अपात्र करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतिंकडे याचिका दाखल केल्या असून यातून राज्यसभा खासदार शरद पवार, लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचं नाव वगळं आहे. यावर अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी आपण या प्रक्रियेत कुठेही नसल्याने आपल्याला यावर काहीही भाष्य करायचं नाही, असं म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in