बाबा बालकनाथ यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला? सोशल मीडियावर केली महत्वाची पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत बाबा बालकनाथ यांचं देखील नाव चर्चेत आहे
बाबा बालकनाथ यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला? सोशल मीडियावर केली महत्वाची पोस्ट

राजस्थान विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला चितपट करत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. यानंतर भाजपाचा राजस्थानमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण यावरुन चांगली चर्चा रंगताना दिसत आहे. राजस्थानमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री बनवणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत बाबा बालकनाथ यांचं देखील नाव चर्चेत आहे. उत्तरप्रदेश प्रमाणे राजस्थानमध्ये देखील भाजप बाबा बालकनाथ यांना मुख्यमंत्रपदी बसवेल असं देखील बोललं जात आहे. मात्र, असं असताना बाबा बालकनाथ यांनी सोशल मीडियावर स्वत:हुन एक ट्वीट केलं आहे. यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले बाबा बालकनाथ ?

बाबा बालकनाथ यांनी सोशलमीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर एक ट्वीट केलं आहे. त्यांच हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय झालं आहे. यात ते म्हणाले की, "पत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच खासदार आणि आमदार होऊन देशसेवा करण्याची संधी जनतेने दिली. निवडणूक निकाल आल्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजूनही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाच्या अनुभव घ्यायचा आहे", बाबा बालकनाथ यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कोण आहेत बाबा बालकनाथ?

बाबा बालकनात २०१९ साली भाजपच्या तिकीटावर अलवकर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर राजस्थानच्या तिजारा मतदार संघातून विजजी झाले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांना पराभव करुन विजय मिळवला आहे. विधासभेला विजयी झाल्यानंतर बाबा बालकानाथ यांनी आपल्या खासदारकीचा राजीमाना दिला. यानंतर त्यांचं नाव राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत चर्चेत आलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ज्या नाथ संप्रदायाचे साधू आहेत, बाबा बालकनाथ देखील त्याचं संप्रदायाचे आहेत.

तरीही सस्पेन्स कायम!

दरम्यान, बाबा बालकनाथ यांनी आपण राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत दिले असले तर राजस्थानच्या मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दिया कुमारी याचंही नाव चर्चेत आहे. तसंच भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या देखील मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. वसुंधरा राजे या राजस्थान भाजपचा मोठा चेहरा देखील आहेत. त्या दोन वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. तसंच विधानसभेला विजयी झालेल्या आमदारांमध्ये वसुंधरा राजे यांच्या समर्थक असलेल्या आमदारांची संख्या मोठी असल्याचं बोललं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in