
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आठ आमदारांसह भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये सामील होत मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतली दोन गट निर्माण झाले. अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीवरच आपला दावा सांगतिला. सध्या हा वाद निवडणूक आयोगात आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फूटीनंतर शरद पवार यांनी राज्यभर फिरून दौरे करुन राष्ट्रवादी पक्षाती नव्याने बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्या ठिकाणी त्यांना उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडून देखील सभा घेण्यात येत आहेत. अशात आता अजित पवार गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जिथे सभा होईल तिथे उत्तर सभा न घेण्याचा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यावर अजित पवार गटाकडून लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवार गट उत्तर सभा घेण्यापेक्षा पक्ष संघटनेवर आणि मतदारांनापक्षासोबत जोडण्यावर भर देणार आहे. अजित पवारांकडून मंत्र्यांना आमदारांची कामं तात्काळ करुन देण्याबाबत देखील सुचना देण्यात आल्याची माहिती मिळथ आहे.
शरद पवार यांच्या सभांच्या पार्श्चभूमीवर उत्तर सभा न घेण्याचा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आला आहे. यापूर्वी नाशिक(येवला), बीड, जळगाव आणि कोल्हापूर येथे शरद पवार यांनी घेतलेल्या सभेनंतर अजित पवार गटाच्या देखील सभा झाल्या होत्या. मात्र, आता या उत्तरसभा न घेण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतला आहे. त्याऐवजी पक्ष संघटन मजबूत करावं , अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.