राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Eknath Shinde) असे दोन शिवसेनेचे गट झाले. शिंदे गटाने भाजपसोबत युती करून महाराष्ट्रात आपली सत्ता आणली. अशामध्येच आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोघांच्या युतीची चर्चा होती. मात्र, आज (बुधवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजगृहावर जात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि तर्कवितर्कांना उधाण आले. या भेटीनंतर दोघांनीही प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले की, "राजगृह येथे बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते. त्यांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यात आली. खऱ्या अर्थाने त्यांनी अभ्यासासाठी ज्या ज्या वस्तू वापरल्या. टेबल्स, खुर्ची त्या जशाच्या तशा आहेत. हा ऐतिहासिक ठेवा मला मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळाला. ही वास्तू बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे. मी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती."
तसेच, प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी माध्यमांसमोर सांगितले की, "मुंबईमध्ये १४ एकर जागा आहे. इंदू मिलमध्ये इंटरनॅशनल रिसर्च सेंटर सुरू करण्याची मागणी केली. त्यासंदर्भात त्यांना माहितीही दिली. याशिवाय कोणतेही राजकीय भाष्य झालेले नाही. असही भाजपसोबत आमची युती होऊच शकत नाही. त्यांच्यासोबत जे जातील त्यांच्यासोबतही आमची युती होऊ शकत नाही. महाविकास आघाडीचे अजून काही ठरलेले नाही. त्यांचे जोपर्यंत काही ठरत नाही, तोपर्यंत आमची त्यांच्यासोबतही युती होऊ शकत नाही." असे त्यांनी स्पष्ट केले आहे.