"देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याचं डोकं फिरलं की काय? " 'त्या' निर्णयावरुन भाई जगताप संतापले

पोलीसांच्या पैसे घेऊन बदल्या करण्यात येतात. पोलीस खात्यात अनागोंदी कारभार सुरु आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे
"देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याचं डोकं फिरलं की काय? " 'त्या' निर्णयावरुन भाई जगताप संतापले

गृहखात्याकडून मुंबई पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ११ महिन्यांसाठी या कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. गृहखात्याने घेतलेल्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी यावरु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यावरुन टीका केली आहे.

मुंबई पोलिसांत कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृहखात्याने घेल्याने आमदार भाई जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. "देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याचं डोक फिरलं की काय? मुंबई पोलीस दल हे जगातील दुसऱ्या नंबरचे पोलीस दल आहे. त्या मुंबई पोलीस दलात ११ महिन्यांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पैसे घेऊन बदल्या करण्यात येतात. पोलीस खात्यात अनागोंदी कारभार सुरु आहे", अशी टीका जगताप यांनी केली आहे.

चार महिन्यांपूर्वी पोलीस भरती झाली होती. तेव्हा पदव्युत्तर शिक्षण असलेले तरुण नोकरीच्या आमिषाने मुंबईत आले. त्यांना कोणत्याही पद्धतीची सोय करण्यात आली नव्हती. यावेळी एका तरुणाचा साप चावल्याने मृत्यूही झाला होता. या पोलीस भरतीचं काय झालं. एखाद्या ठिकाणी मोठा अपघात किंवा घटना घडली तर हे कंत्राटी पोलीस काय करणार?" असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. मात्र, पोलीस आणि सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. याने महाराष्ट्र आणि देश कसा चालणार? असं म्हणत देवेंद्र फडणवीस हा निर्णय रद्द करतील अशी अपेक्षा भाई जगताप यांनी व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in