'या' कारणामुळे सत्ताधारी आमदारांचं विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन; उद्धव ठाकरेंनी उत्तर देण्याची मागणी

या आंदोलनत भाजप आमदारांचा समावेश होता
'या' कारणामुळे सत्ताधारी आमदारांचं विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन; उद्धव ठाकरेंनी उत्तर देण्याची मागणी

कालपासून राज्यात हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश खरगे यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संताप व्यक्त करत हे आंदोलन केले आहे.

कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते. मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता. या वक्तव्यावरून राज्यभर रान पेटले आहे. त्याचे पडसाद आज विधानभवन परिसरातही दिसून आले आहे. परिसरात सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी स्वातंत्र्यविरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ निदर्शने केली आहेत.

या आंदोलनामध्ये आशिष शेलार, बंटी भांगडिया, सुनील राणे, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, सीमा हिरे, मोनिका रानजळे, हरीभाऊ बागडे, नमिता मुंदडा, राजेश पाडवी, मंदा म्हात्रे, सुधीर गाडगीळ, राणा जगजितसिंग, उमा खापरे, राम कदम, आणि समीर मेघे यांचा सहभाग होता.

यावेळी शेलार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे समस्त क्रांतीकारक आणि देशभक्तांचा अपमान आहे. हा देश त्यांचे बलिदान कधीच नाकारू शकत नाही. इंदिरा गांधी यांनी स्वत: त्यांच्या बलिदानाचे समर्थन केले होते. पण, काँग्रेस आणि खरगे हे सतत सावरकरांना बदनाम करत आहेत. ते महाराष्ट्रद्रोही असून त्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. त्यामुळे या विषयावर उद्धव ठाकरे यांनी जबाब द्यावा.

logo
marathi.freepressjournal.in