
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिंडेंवर टीका करताना ब्राम्हण समजात शिवाजी आणि संभाजी अशी ही नावे ठेवत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. भुजबळांच्या या विधानावर आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली गेली होती. यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी माझा कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असं सांगितलं. यावेळी भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
महापुरुषांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झाल्याशिवाय ते सरळ होणार नाहीत. भिडेंना कोणीही पाठीशी घालू नये. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात गोंधळ उडेल, असा इशारा छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. आता पुन्हा एकादा त्यांनी संभाजी भिडेंविषयी वक्तव केलं आहे. ते म्हणाले की, संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही ते आधी स्पष्ट करा. किंवा ते मनोहर कुलकर्णी नाहीत हे स्पष्ट करा. ते मनोहर कुलकर्णी आहेत तर मग त्यांना संभाजी हे नाव लावण्याची आवश्यकता का भासली ? असं देखील भुजबळ म्हणाले.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, मनोहर कुलकर्णी यांनी खऱ्या नावाने प्रबोधन करावं. पण हे नाव घ्यायचं आणि बहुजन समाजात जायचं, ते बरोबर नाही. यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहोत. संभाजी नाव लावून ते माझे आंबे खा मग मुलं होतील बोलतात. त्यांचं अमुक तमुक बोलण सुरुचं असतं, असं असेल तर त्याला आम्ही विरोध करणार, असं देखील भुजबळ म्हणाले.
संभाजी भिडे हे सातत्याने वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. अलिकडेच त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी यांच्या वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली. यानंतर त्यांच्याविरोधात काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांनी राज्यभर आक्रमक होत आंदोलन केलं. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले.त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी देखील होऊ लागली.