गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांवर पलटवार; म्हणाले,"विविध समुदायांनी मिळून मराठा साम्राज्य निर्माण केलं. पण..."

पूर्वी एका अनाजी पंताने मराठा साम्राज्य उदध्वस्त केलं होतं. आता आधुनिक अनाजी पंत महाराष्ट्र धर्माचा ऱ्हास करत असल्याची टीका रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.
गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांवर पलटवार; म्हणाले,"विविध समुदायांनी मिळून मराठा साम्राज्य निर्माण केलं. पण..."

राज्यात मराठा आरक्षणावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी राज्यात सद्या उद्भवलेल्या परिस्थितीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारी धरलं आहे. यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. पडळकर यांनी मराठा आरक्षण रद्द होण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जबाबदार धरलं आहे.

मराठा समाजाच्या सध्याच्या आंदोलनावर रोहित पवार म्हणाले की, पूर्वी एका अनाजी पंताने मराठा साम्राज्य उदध्वस्त केलं होतं. आता आधुनिक अनाजीपंत महाराष्ट्र धर्माचा ऱ्हास करत आहे. रोहित पवार यांनी या महिन्याच्या सुरुवातीपासून आपल्या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या विविध जिल्ह्यात दौरे सुरु केले आहेत.

रोहित पवार यांनी अनाजी पंत म्हणत केलेल्या टिकेवरुन गोपीचंद पडळकर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, विविध समुदायांनी मिळून मराठा साम्राज्य निर्माण केलं. पण सूर्याजी पिसाळ, गणोजी शिर्के यांच्यासारख्या लोकांनी ते उद्ध्वस्त केलं. देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र, तुमच्या आजोबा शरद पवार यांनी ते मागे घेतलं, अशी टीका पडळकर यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी सुरु असेलेल्या आंदोलनादरम्यान दोन्ही नेत्यांनी सोशळ मीडियावर याबाबतचे संदेश शेअर केले होते. धनगर नेते गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी करत आहेत. याच मागणीसाठी समाजाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला मुदत देखील दिली होती. धनगर समाजाला एसटी समाजात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आता धनगर समजाकडून राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलने केली जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in