नवी मुंबईवर अन्याय होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवाद बैठकीत आश्वासन

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई जिल्हा भाजपचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
नवी मुंबईवर अन्याय होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवाद बैठकीत आश्वासन

नवी मुंबई : उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई जिल्हा भाजपचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपले राजीनामे परत घेऊन महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आमदार गणेश नाईक हे नवी मुंबईच्या विकासाचे शिल्पकार असून नवी मुंबईच्या विकासासाठी आणि नवी मुंबई भाजप जिल्हा मजबूत करण्यासाठी आपले नेहमी पाठबळ असेल. नवी मुंबईवर आपण अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार नवी मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी महायुतीच्या निवडणूक प्रचारासाठी सज्ज झाले असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ठाणे लोकसभेच्या उमेदवाराला मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.

या बैठकीचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचाराची धुरा खांद्यावर असताना अतिशय व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उपमुख्यमंत्री फडणवीस नवी मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांच्या भावना जाणणारे नेतृत्व आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद जास्त असल्याने हा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा होती.

संवाद बैठकीमध्ये नवी मुंबई भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र इथापे, महामंत्री नेत्रा शिर्के आणि महामंत्री सुरज पाटील यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्ष नेतृत्वाच्या आणि आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार महायुतीच्या विजयासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी काम करू, अशी ग्वाही या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या बैठकीस आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह माजी महापौर, वरिष्ठ पदाधिकारी, नवी मुंबईसह ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. ती अनपेक्षितपणे व्यक्त झाल्याचे सांगितले. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या पदाचे दिलेले राजीनामे परत घेऊन निवडणूक प्रचाराचे काम करतील. - आ. गणेश नाईक

सत्तेसाठीचा त्याग आठवावा

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, ही बाब आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितली. पक्षहितासाठी अनेक वेळा त्याग करावा लागतो. असे नमूद करून राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र यांनी केलेला त्याग कार्यकर्त्यांनी आठवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी यावेळी केले.

काँग्रेसच्या माजी नगरसेविकेसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

संवाद बैठकीप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई मनपाच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील, नेरूळचे काँग्रेस तालुका सचिव दिनेश गवळी, गणेश पालवे, संकल्प पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

logo
marathi.freepressjournal.in