केजरीवाल बांधत आहेत विरोधकांची मोठ; उद्धव ठाकरेंची घेतली दुसऱ्यांदा भेट

आम्हाला दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली असल्याचे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केले.
केजरीवाल बांधत आहेत विरोधकांची मोठ; उद्धव ठाकरेंची घेतली दुसऱ्यांदा भेट

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकार टीका केली आहे. आम्हाला दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली असल्याचे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केले. तर जनतेला जागे करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. अध्यादेशाचा निर्णय हा अहंकारातून आला असून अहंकारी माणूस देश चालवू शकत नाही, असे देखील यावेळी केजरीवाल यांनी म्हटले. या भेटी दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते.

नाती जपण्यासाठी मातोश्री प्रसिद्ध

यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रसरकारच्या एकाधिकारशाही वृत्तीवर सडकून टीका केली. "मातोश्री नाती जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही राजकारणापलीकडे जाऊन नाती जपली आहेत. केजरीवाल हे दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिल्लीविषयी दिलेला निकाल हा लोकशाहीसाठी आवश्यक होता. परंतु, केंद्राने अध्यादेश काढला. ही कोणती लोकशाही आहे? राज्यात निवडणुका न होता फक्त केंद्रात निवडणुका होतील, असेही दिवस येऊ शकतात. 2024 पर्यंत फारफारतर निवडुका होऊ शकतात. लोकांना जागे करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत", असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी बोलताना म्हणाले की, "दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरे यांची साथ मिळाली आहे. आम्ही नाती जपणारे लोक आहोत. आम्ही आता उद्धव ठाकरे कुटुंबाचा भाग आहोत. दिल्लीकरांनी आपल्या अधिकरांसाठी मोठी लढाई लढली. मात्र केंद्र सरकारने अध्यादेश काढून आमची ताकद हिरावून घेतली आहे. आठ वर्ष लढा दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. पण केंद्राने आठ दिवसात अध्यादेश काढून आमचा अधिकार हिरावून घेतला. हा निर्णय अहंकारातून आला असून अहंकारी माणूस देश चालवू शकत नाही", असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

अध्यादेशविरोधातील समर्थनासाठी नेत्यांच्या भेटीगाठी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राच्या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत समर्थन मिळावे यासाठी देशातील मुख्य पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचा धडाका लावला आहे. सुरुवातीला केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. तर काल (23 मे) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ते सकाळी मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांनी मातोश्रीवर जाऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर उद्या (25 मे) रोजी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय केंद्रसरकारने लोकसभेत अध्यादेश काढत रद्द केला. मात्र या अद्यादेशाला राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवा विरोधकांची मोठ बांधताना दिसत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in