प्रतिनिधी/मुंबई
महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेचा तिढा आता वाढतच चालला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच उदयोगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे दोघेही या जागेवरून लढण्यावर ठाम आहेत. या दोघांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. आता हा वाद बहुतेक दिल्लीपातळीवरच सुटेल अशी शक्यता आहे.
भाजपाकडून या मतदारसंघात नारायण राणे निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत़त्वाखालील शिवसेनेतर्फे उद्योगमंत्री उदय सामंत यंचे बांधून किरण सामंत देखील निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. किरण सामंत यांनी तर रविवारी थेट नागपूर गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. मात्र भेटीनंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दुसरीकडे नारायण राणे यांनी मतदारसंघात सभा घ्यायलाही सुरूवात केली आहे.
सोमवारी नारायण राणे आणि किरण सामंत या दोघांनीही प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. या मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल आहे. त्यामुळे या दोघांच्या स्पर्धेत नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे आता सगळयांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, हा तिढा आता दिल्लीपातळीवरच सुटण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडूनच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.