सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...

आता राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...

मोदी आडनाव मानहानी प्रकरणात दोषी ठरवत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधी यांची खासदारकी सुद्धा रद्द करण्यात आली होती. यानंतर गुजरात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल गांधी यांना ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "काहीपण होऊ दे, त्याची काळजी मी करत नाही, मी माझं काम करतच राहणार, आयडिया ऑफ इंडियाचं संरक्षण मी करतचं राहणार, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे."

राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले की, "आज नाही तर उद्या, सत्याचा विजय होणारच होता. मला काय करायचं आहे ते मला माहिती आहे. ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि जनतेने मला भरभरून प्रेम दिलं, त्यांचेही आभार." सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयात हजेरी लावली आणि सर्वांचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा रागाच्या विरोधात प्रेमाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली आहे.

हा लोकशाहीचा विजय असल्याचं काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं. तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. प्रियंका यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहले आहे की, "गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे, तीन गोष्टी कधीही जास्त वेळ लपून राहू शकत नाहीत, त्या म्हणजे चंद्र, सूर्य आणि सत्य. सर्वोच्च न्यायालायने न्याय दिल्याबद्दल त्यांचे आभार. सत्यमेव जयते."

logo
marathi.freepressjournal.in