Sanjay Raut: "...तर आम्ही तुम्हाला नक्की बांबू लावू", 'त्या' प्रकरणावरुन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर बरसले

मुंबई महानगरपालिकेचे मागील 25 वर्षांचे ऑडिट केले जाणार, यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात येणार आहे. यावर देकील राऊत यांनी भाष्य केलं आहे.
Sanjay Raut: "...तर आम्ही तुम्हाला नक्की बांबू लावू", 'त्या' प्रकरणावरुन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर बरसले
Published on

शिवसेनेच्या 'सामना'या मुखपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखान केल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करतो. मात्र, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवारहलाल नेहरु यांच्यावर टीका केली. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच देशाच अनेक राजकारणी वक्तव्य करतात. जर लोक त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला लागले तर आणिबाणी विरोधात लढलो असं म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना चागलंच धारेवर धरलं. सत्ताधाऱ्यांना जी काही चौकशी करायची आहे त्यांनी ती करावी, त्यांना शिव्या द्यायच्या तर देऊ द्या,आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, आमच्यावर काय चौकशा लावायच्या त्या लावा, हे घटनाबाह्या सरकार आहे. एक वेळ अशी येणार की आम्ही तुम्हाला बांबू लावू, असा इशारा संजय राऊत यांनी नागपूर येथे प्रसार माध्यामांशी बोलताना दिला आहे.

राऊत पुढं म्हणाले की, "तुम्हाला एसआयटी स्थापन करायची आहे तर करा, सीआयए, केजीबीला द्यायचे तर तिकडे द्या. खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची त्यासाठी हा कारखाना आहे. लाखो लोक शिवसेनेत आहे, त्यासाठी स्वतंत्र एसआयटी लावा. तपास यत्रणांचा हवा तसा वापर करा आणि कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडा. सरकारं बदलणार आहे. आम्ही दबाव तंत्राला भीक घालत नाही. 2024 नंतर सरकार बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ही सगळी तात्पुरती व्यवस्था आहे. लवकरच सरकार बदलणार आहे.असा दावा देखील त्यांनी केला.

मुंबई महानगरपालिकेचे मागील 25 वर्षांचे ऑडिट केले जाणार, यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात येणार आहे. यावर देकील राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट करण्यापूर्वी मागील दोन वर्षांचं ऑडिट आधी करा. मात्र त्यापूर्वी नागपूर, ठाणे, पुणे या सर्व महानगरपालिकांचं देखील ऑडिट करा. त्याचवेळी नगरविकास खात्याचेही देखील ऑडिट करा, तिकडचे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. जर तुमच्याकडे ऑडिटर नसतील तर आम्ही मदत करू".

नरेंद्र मोदींविषयी माझ्या मनात नेहमीच आदर राहिला आहे. जर एखादी व्यक्ती राजकीय भूमिका घेते तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करतात. देशााचे प्रधानमंत्री ही राजकीय संस्था आहे, व्यक्ती नाही. आम्हाला त्या पदाबद्दल आदर आहे. तीन राज्यांत कसे माहिती नाही पण भाजपने बहुमत आणून विजय प्राप्त केला आहे . त्या राज्यात मुख्यमंत्री पदाचे अपॉइंटमेंट लेटर दिल्लीतून येतात, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला

logo
marathi.freepressjournal.in