
महाविकास आघाडीत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दुय्यम वागणूक देतात. अशी टीका करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी शिवसेतून बंडखोरी केली. त्यावेळी अनेकांना आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेकांना मंत्रीपद मिळाले. यानंतर इतर आमदारांना दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. हे आमदार गेल्या वर्षभरापासून मंत्रपदाची वाट पाहत होते. अशात अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने तसंच अजित पवारांसह ९ जणांना मंत्रीपद मिळाल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता वाढल्याने दोन आमदारांमध्ये मंगळवारी हमरी तुमरी झाल्याचे समजते. याबाबतचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुंबईत परतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल 'वर्षा' बंगल्यावर झालेल्या बैठकीत आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटात धुसफुस सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील मंत्रीपद न मिळालेले ८ ते १० आमदार संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी , शिंगे गटाचे ८ ते १० आमदार मातोश्रीच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे. संपर्कात असलेल्या या आमदारांची नावे माझ्याकडे आहेत. ज्यांना मंत्रीपद मिळणार असं वाटत होतं. पण मिळालं नाही त्यापैक अनेकजणांची नावे या यादीत आहेत. यात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारही आहेत. मंत्री पदे जातील असं वाटणाऱ्यांची नावे देखील या यादीत आहे. तर ज्यांनी मंत्रीपदाचे कपडे शिवले होते, ते देखील या यादीत आहेत, असा दावा ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत यांनी केला आहे.