Sushma Andhare: सुषमा अंधारे यांनी 'त्या' विधानावरुन जरांगे-पाटलांना खडसावलं, म्हणाल्या, "एकीकडे मागास म्हणायचं आणि..."

जरांगे-पाटलांची भूमिका पाहून त्यांनी आरक्षणावरील लक्ष विचलीत होत असल्याचं म्हटलं आहे.
Sushma Andhare: सुषमा अंधारे यांनी 'त्या' विधानावरुन जरांगे-पाटलांना खडसावलं, म्हणाल्या, "एकीकडे मागास म्हणायचं आणि..."

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना त्यात आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. अंधारे यांनी जरांगेंना चांगलचं खडसावलं आहे. जरांगे-पाटलांची भूमिका पाहून त्यांनी आरक्षणावरील लक्ष विचलीत होत असल्याचं म्हटलं आहे. याच बरोबर व्यक्तीगत टीका-टीपण्णी करण त्यांना शोभत नाही, असं देखील अंधारे यांनी म्हटलं आहे.

जरांगे यांच्याविषयी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, "जरांगे-पाटील हे सुरुवातीला आरक्षणासाठी लढत असल्याचं निश्चित वाटत होतं. पण अलीकडे त्यांची भूमिका पाहून आरक्षणावरील लक्ष्य विचलीत झाल्याचं वाटत आहे. त्यांनी व्यक्तीगत टीका-टीपण्णी करणं शोभत नाही"

अंधारे या पुढे बोलताना म्हणाल्या की, एकीकडे मागास असल्याचं सांगायचं आणि जरांगे आडनावाबरोबर पाटील लावायचं. आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे १०० जेसीबीने फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची, असं म्हणत त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. केंद्रसरकारच यातून मार्ग काढू शकते. विधिमंडळाने एक ठराव पास करुन केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

पण, केंद्र आणि राज्यातील भाजपा भांडण लावण्याचं काम करत आहे. कारण महिला सुरक्षा, आरोग्य व्यवस्था, कायदा सुव्यस्था, कंत्राटी भर्ती बेरोजगारी, दुष्काळी परिस्थीतीबाबत भाजपा अपयशी ठरली आहे. सगळे मुद्दे विचलीत करुन भाजपने फक्त आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. भाजपला आरक्षण द्यायचं नसून फत्त जातीजातीत भांडण लावायचं आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.

यावेळी सुष्मा अंधारे यांना जरांगे-पाटील यांचा बोलविता धनी कुणी आहे का? असा प्रश्न विचारला गेला. यावर त्यांनी, जरांगे-पाटील यांनी जाव धोक्यात घालून आंदोलने केली. त्यामुळे ते कुणाचं ऐकून बोलत असतील असं वाटत नाही. पण, समोरील गर्दी एखाद्याची मनस्थिती बदलू शकते. तेव्हा अशी विधान येऊ शकतात, असं उत्तर दिलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in