प्रतिनिधी/मुंबई : राज्य सरकारच्या अध्यादेशमुळे मराठा समाजाला असलेला अधिकार सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम झाले आहे. नोंदी असणाऱ्या मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणे कायदेशीरच होते. हे करत असताना ओबीसी समाजाला देखील शंभर टक्के सुरक्षा दिली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, यावर काही नेत्यांची व्यक्तिगत भूमिका वेगळी असू शकते. नेमके काय केले आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्यात येईल. मराठा समाजाला फायदा होत असताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, असा सुवर्णमध्य शासनाने काढला आहे. यामुळे कोणालाही चिंता करण्याचे कारण नाही. आमचे सरकार ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. मागच्या काळात मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. परंतु काही कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण फेटाळले. याच कारणांची मीमांसा करणारे सर्वेक्षण देखील आपण सुरू केले असल्याचेही ते म्हणाले.