नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून गुरुवारी त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या १२ राज्यांमधील ८८ मतदारसंघासाठी ही दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली.
या अधिसूचनेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल असून ५ एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर जम्मू-काश्मीरमध्ये ६ एप्रिलला छाननी होईल.
दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात खालील राज्ये व त्यातील मतदारसंघ आहेत. यात आसाम - ५, बिहार - ५, छत्तीसगड - ३, जम्मू काश्मीर - १, कर्नाटक - १४, केरळ - २०, मध्य प्रदेश - ७, महाराष्ट्र - ८, राजस्थान - १३, त्रिपुरा - १, उत्तर प्रदेश - ८, पश्चिम बंगाल - ३, मणिपूर - १ यांचा समावेश आहे.
आसाममधील पाच जागा
आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात नागाव, दारंग-उदलगुडी, दिफू (एसटी), सिल्चर (एससी) आणि करीमगंज येथे मतदान होणार आहे. काँग्रेसचे खासदार प्रद्यु बोरडोलोई आणि भाजपचे सुरेश बोरा हे नागाव मतदारसंघातून रिंगणात आहेत.