...तर महाविकास आघाडी सरकार दोन वर्षापूर्वीच कोसळले असते - अनिल देशमुख

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील देशमुख यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.
...तर महाविकास आघाडी सरकार दोन वर्षापूर्वीच कोसळले असते - अनिल देशमुख

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी दोन वर्षापूर्वी भाजप प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार हे दोन वर्षापूर्वी कोसळले असते, असे ते म्हणाले आहेत. अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधान आले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील देशमुख यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. अनिल देशमुख यांचे म्हणणे रास्त असून मला सगळा प्रकार माहिती असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांनी केलेला दावा

माझ्याकडे दोन वर्षापूर्वीच काही प्रस्ताव आले होते. मी समझौता केला असता तर दोन वर्षापूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळले असते आणि माझ्यावर कारवाई झाली नसती. पण मी सगळं सहन केले. मी कुठल्याही पद्धतीने खोटे आरोप करणार नाही. तडजोड करायला नकार दिल्यानेच मला हे सगळ भोगावं लागले असल्याचेही ते म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी दिला अनिल देशमुख यांच्या दाव्याला दुजोरा

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला दुजोरा दिला आहे. देशमुख यांना कोणती ऑफर होती. तसेच त्यांच्यावर कुठला दबाव होता हे मला माहिती आहे. त्यांच्याकडे यासंदर्भाती पुरावे आणि व्हिडिओ क्लिप्स आहेत. त्यांना कोण भेटले? ऑफर कुणी दिल्या? त्याच्याशी कोण काय बोलले? कुठल्या सह्या घेऊ इच्छित होते? कोणावर आरोप करण्यासाठी दबाव टाकला जात होता? याबाबतची सगळी माहिती देशमुख यांच्याकडे होती, असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी त्यातील काही पुरावे हे शरद पवारांनाही दाखवले असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी अनिल देशमुख याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in