राष्ट्रवादी नाव आणि पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. शरद पवार गटाकडून आयोगात युक्तिवाद सुरु आहे. यावेळी देवदत्त कामत यांनी हा अध्यक्षपदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे. त्यासाठी रचलेला कट असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस २०१९ साली आघाडी करत निवडणुकीला समोरं गेले होते. यात ५४ आणि ४४ आमदार विजयी झाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. अजित पवार यांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही किंवा भूमिका देखील राहीली नाहीस, असं देवदत्त कामत यांनी शरद पवार यांच्या गटाकडून युक्तीवाद करताना सांगतिलं.
शरद पवार हेच आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनीच पक्षाचा विस्तार केला. ते निर्विवाद अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदावरुन प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही, असं देखील देवदत्त कामत म्हणाले. यावेळी सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला असल्याचंही शरद पवार गटाकडून आयोगात सांगण्यात आलं.
ही पक्षांतर्गत फूट नसून हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. अजित पवारांना पक्षातील सर्व सत्ता हवी आहे. त्यांच्याकडे पक्षाची कोणती जबाबदारी देखील नव्हती, असं देखील देवदत्त कामत यांनी सांगितलं.