भारत-दक्षिण यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना पावसात वाहून गेलेला असतानाच चिन्नास्वामी स्टेडियमच्या गलथान व्यवस्थेचे विदारक चित्रही पावसामुळे पाहायला मिळाले. छत गळल्यामुळे प्रेक्षकांना चक्क भिजावे लागले. स्थानिक क्रिकेट असोसिएशनबरोबरच भारतीय क्रिक्रेट मंडळाच्या (बीसीसीआय) नावानेही काही प्रेक्षकांनी बोटे मोडली. बीसीसीआयलाच ‘धारे’वर धरले. क्रिकेट शौकिनांनी सोशल मीडियावर बीसीसीआयला जबरदस्त ट्रोल केले.
ज्येष्ठ समालोचक आकाश चोप्राने म्हणाले की, स्टेडियममध्ये चांगल्या दर्जाचे छप्पर असायलाच हवे. स्टेडियममध्ये गुंतवणूक करताना प्रेक्षकांच्या गरजांकडे लक्ष देणेही जरूरीचे आहे. एक प्रेक्षक श्रीनिवासन राममोहन याने छत गळतीचा व्हिडिओ बनवून सोशल व्हायरल केला. दुसऱ्या एका प्रेक्षकाने ट्विटरवर लिहिले की, बाहेर आणि आत सारखाच पाऊस पडला. बीसीसीआय क्रिकेटमधून सर्वाधिक कमाई करणारी संस्था असल्याचे सर्वज्ञात झाल्याने आणि त्या तुलनेत प्रेक्षकांच्या सोयीसुविधांबाबत हलगर्जीपणा होत असल्याने प्रेक्षकांनी स्थानिक क्रिकेट असोसिएशन ऐवजी थेट बीसीसीआयलाच लक्ष्य केले. अलीकडेच २०२३ ते २०२७ पर्यंतच्या आयपीएल मीडिया हक्कांचा सुमारे ४८ हजार कोटींमध्ये लिलाव झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी लिलावातून मिळणारी रक्कम पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळेही प्रेक्षकांना संताप अनावर झाला असण्याची शक्यता आहे.