कोहली-रोहितपाठोपाठ रवींद्र जडेजाची टी-२० फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा; भारतीय चाहत्यांना आणखी एक धक्का

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजानेही टी-२० फॉरमॅटमधील निळी जर्सी कायमची सोडण्याची घोषणा केली आहे.
रविंद्र जडेजा
रविंद्र जडेजाBCCI

मुंबई : टीम इंडिया T-20 वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर देशभरात आनंदोत्सव सुरु असतानाच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर केली. कोहलीपाठोपाठ भारताचा कर्णधार रोहित शर्मानंदेखील T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा केली. या धक्क्यांमधून सावरलेले नसतानाच भारतीय चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. कोहली-रोहितएकापाठोपाठ आणखी एका दिग्गजांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. आता टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटमधील निळी जर्सी कायमची सोडण्याची घोषणा केली आहे. जडेजाने टीम इंडियाच्या विजयाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, 30 जून रोजी निवृत्ती जाहीर केली.

उर्वरित फॉरमॅट खेळत राहणार-

रवींद्र जडेजाने टीम इंडियाच्या विजयानंतर काही तासांनी इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत T20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. परंतु वनडे आणि कसोटीमध्ये टीम इंडियासाठी आपला मजबूत खेळ दाखवणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे. जडेजाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, विश्वचषक जिंकणे हा त्याच्या T20 कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा होता. जडेजाने सांगितले की, मी आनंदी मने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडत आहे. तो पुढे म्हणाला की, "मी नेहमीच देशासाठी सर्वोत्तम योगदान देत आलो आहे आणि इतर फॉरमॅटमध्येही ते करत राहीन."

रवींद्र जडेजाने या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी सर्व ८ सामने खेळले. तथापि, ही स्पर्धा त्याच्यासाठी फारशी फलदायी ठरली नाही आणि ना तो फलंदाजीत खास करू शकला ना गोलंदाजीत प्रभाव पाडू शकला. त्याला स्पर्धेच्या ७ डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, पण तो फक्त १ बळी घेऊ शकला. त्याच ५ डावात त्याच्या बॅटमधून फक्त ३५ धावा आल्या. क्षेत्ररक्षणात त्याची जादू निश्चितपणे चालू राहिली, जिथे त्याने अनेक धावा रोखल्या.

जडेजाची T20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी होती?

फेब्रुवारी २००९ मध्ये श्रीलंका दौऱ्यात जडेजाने टीम इंडियासाठी या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो जवळपास प्रत्येक T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात झालेल्या शेवटच्या टी-२० विश्वचषकात सहभागी होऊ शकला नव्हता. आपल्या कारकिर्दीत जडेजाने टीम इंडियासाठी ७४ सामने खेळले, ज्यात त्याने २१ च्या सरासरीने ५१५ धावा आणि २९.८५ च्या सरासरीने ५४ विकेट घेतल्या.

logo
marathi.freepressjournal.in