नीता अंबानी यांना बीसीसीआयची नोटीस; आयपीएलमध्ये परस्पर हितसंबंध जपल्याचा आरोप
एका कंपनीतील व्यक्ती एकाच वेळी आयपीएलचा संघही विकत घेते आणि आयपीएल स्पर्धेचे हक्कही विकत घेते, हे आक्षेपार्ह असल्याचे सांगत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांच्यावर नोटीस बजावली आहे. परस्पर हितसंबंध जपल्याचा आरोप नीता अंबानी यांच्यावर करण्यात आला आहे.
बीसीसीआयचे नीतिमत्ता अधिकारी विनीत सरन यांनी नीता अंबानी यांना नोटीस पाठविली. नीता अंबानी यांना २ सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावरील आरोपांवर लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. नीता अंबानी या या नोटिशीला काय उत्तर पाठवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
नीता अंबानी यांच्याबाबतची तक्रार ही माजी एमपीसीए सदस्य संजीव गुप्ता यांनी केली होती. त्यानंतर अंबानी यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. संजीव गुप्ता यांनी आरोप केला की, “मुंबई इंडियन्सच्या मालकांनी आयपीएलमध्ये परस्पर हितसंबंध जपल्याचे दिसून येत आहे.”