भारतातच खेळा, नाहीतर गूण गमवा! ICC चा बांगलादेशच्या मागणीला नकार, सुरक्षेला धोक्याचा दावाही फेटाळला - रिपोर्ट

बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलवण्याबाबत "विचार करण्याची" विनंती बांगलादेशने केली होती. त्यानंतर मंगळवारी (६ जानेवारी) ICC आणि BCB अधिकाऱ्यांमध्ये ऑनलाइन बैठक झाली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

आगामी ICC पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारतात खेळताना बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेला धोका असल्याची कोणतीही ठोस माहिती नाही, असे स्पष्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी सध्या फेटाळली आहे. तसेच, बांगलादेशला भारतात येऊन विश्वचषक खेळावा लागेल, अन्यथा गुण गमावण्याचा धोका पत्करावा लागेल, असा स्पष्ट संदेश ICC ने दिल्याचे 'रिपोर्ट्स'मधून समोर आले आहे.

सुरक्षेला धोक्याचा दावा फेटाळला

Cricbuzz च्या वृत्तानुसार, मंगळवारी (६ जानेवारी) ICC आणि BCB अधिकाऱ्यांमध्ये ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत, भारतात बांगलादेश संघाला कोणताही सुरक्षा धोका असल्याचे कोणतेही ठोस किंवा विश्वासार्ह इनपुट नाहीत. त्यामुळे सध्या तरी स्पर्धेचे वेळापत्रक किंवा सामने होणारी ठिकाणे बदलण्याचे कोणतेही कारण नाही, असे ICC ने स्पष्टपणे सांगितले. तथापि, बैठकीत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. १० जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय BCB ला कळवला जाण्याची शक्यता आहे. ICC आपल्या भूमिकेत बदल करण्याची शक्यताही नसल्याचे संकेत बैठकीत मिळाल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

भारतातच खेळा, नाहीतर गूण गमवा

तर, ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, मंगळवारी झालेल्या व्हर्च्युअल कॉलमध्ये ICCने बांगलादेशचे सामने सुरक्षेच्या कारणास्तव भारताबाहेर हलवण्याची मागणी फेटाळली. तसेच, बांगलादेशला भारतात येऊन विश्वचषक खेळावा लागेल, अन्यथा गुण गमावण्याचा धोका पत्करावा लागेल, असा स्पष्ट संदेश ICCने दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हा दावा फेटाळत, ICCकडून असा कोणताही अल्टिमेटम मिळालेला नाही, असे सांगितले आहे. दरम्यान, या बैठकीच्या निर्णयाबाबत अद्याप ICC किंवा BCBकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. BCBने रविवारी ICCकडे पत्र पाठवून, बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलवण्याबाबत “विचार करण्याची” विनंती केली होती. त्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुस्तफिजूर रहमानला बाहेर काढल्यामुळे बांगलादेशचा संताप

भारत आणि बांगलादेशमधील राजकीय तणाव आणि बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर भारतात बांगलादेशविरुद्ध नाराजीचा सूर आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत बांगलादेशच्या खेळाडूंना खेळवू नये, अशी टीका वारंवार बीसीसीआयवर होत होती. त्यानंतर बीसीसीआयने यंदाच्या हंगामातील बांगलादेशचा एकमेव खेळाडू मुस्तफिजूर रहमानला मुक्त करण्याचे आदेश त्याच्या केकेआर संघाला दिले होते. शाहरूख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघानेही या निर्देशाचे पालन करत मुस्तफिजूरला मुक्त केले. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आपला संघ पाठवण्यास नकारघंटा दर्शवली आहे. तसेच, आयपीएलच्या प्रक्षेपणावरही बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in