आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना आज (दि. १४) रंगणार आहे. रात्री ८ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. हा सामना रद्द करण्याची मागणी होत असतानाच BCCI ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
देवजीत सैकिया यांचे स्पष्टीकरण
BCCI चे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, "आम्ही आशिया कपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला कारण ही बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. ऑलिंपिक, फिफा किंवा आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्ससारख्या स्पर्धांमध्ये जसे सहभागी व्हावे लागते, तसेच हेही आहे. अशा बहुपक्षीय स्पर्धांवर बहिष्कार टाकल्यास भविष्यात भारताला कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसेल."
सैकिया यांनी पुढे स्पष्ट केले की, "जर हा सामना द्विपक्षीय असता, तर आम्ही नकार दिला असता. पण बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळणे हे भारत सरकारचे धोरण आहे. त्यामुळे भारताला खेळण्याशिवाय पर्याय नाही."
माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही स्पष्ट केले होते की, भारत-पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका होणार नाही. मात्र, आशिया कप किंवा विश्वचषकासारख्या बहुपक्षीय स्पर्धांमध्ये भारताला उतरावेच लागेल.