मालिका विजेता दक्षिण आफ्रिका संघ
मालिका विजेता दक्षिण आफ्रिका संघ

भारताची मायदेशात सर्वात मोठी मानहानी! कसोटी इतिहासात प्रथमच तब्बल ४०८ धावांनी दारुण पराभव; दक्षिण आफ्रिकेकडून 'व्हाईटवॉश'

IND vs SA : गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात खेळणाऱ्या भारतीय संघावर बुधवारी मायदेशातील सर्वात मोठी मानहानी ओढवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताला तब्बल ४०८ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताने मालिका ०-२ अशी तर गमावलीच, त्याशिवाय कसोटी इतिहासात भारताचा हा आजवरचा सर्वात मोठा पराभव ठरला. त्यामुळेच भारतीय कसोटी क्रिकेटमधील हा जणू काळा दिवस ठरला.
Published on

गुवाहाटी : गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात खेळणाऱ्या भारतीय संघावर बुधवारी मायदेशातील सर्वात मोठी मानहानी ओढवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताला तब्बल ४०८ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताने मालिका ०-२ अशी तर गमावलीच, त्याशिवाय कसोटी इतिहासात भारताचा हा आजवरचा सर्वात मोठा पराभव ठरला. त्यामुळेच भारतीय कसोटी क्रिकेटमधील हा जणू काळा दिवस ठरला.

गुवाहाटीच्या बारस्परा स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत आफ्रिकेने दिलेल्या ५४९ धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव ६३.५ षटकांत १४० धावांत आटोपला. रवींद्र जडेजाने फक्त ५४ धावांची अर्धशतकी झुंज दिली. मात्र सायमन हार्मरने सहा फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवून भारताला गुंडाळले. तर मार्को यान्सेन सामनावीर, तर हार्मर मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आफ्रिकेने २५ वर्षांनी भारतात मालिका जिंकली. तर भारतावर सलग दुसऱ्या वर्षात कसोटी मालिकेत व्हाइटवॉश पत्करण्याची वेळ ओढवली. त्यामुळे कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघावर चोहीकडून टिका करण्यात येत आहे. तसेच पुढील काही दिवसांत प्रशिक्षकांसह खेळाडूंनाही चाहत्यांचा रोषाला सामोरे जावे लागू शकते.

तत्पूर्वी, कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतावर ३० धावांनी सरशी साधली. याबरोबरच आफ्रिकेने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना मान लचकल्याने २६ वर्षीय गिलला दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीला मुकला असून २८ वर्षीय पंत भारताचा ३८वा कसोटी कर्णधार म्हणून या सामन्यात नेतृत्व करत आहे.

गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच पत्कराव्या लागलेल्या कसोटी मालिका पराभवातून भारताने अद्याप बोध घेतला नसल्याचे पहिल्या कसोटीत स्पष्ट झाले. फिरकीला पूर्णपणे पोषक खेळपट्टी बनवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला. कारण आफ्रिकेने १२४ धावांचा यशस्वी बचाव करताना भारतावर ३० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. २०१० म्हणजे १५ वर्षांनी प्रथमच आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतात एखादी कसोटी जिंकली, हे विशेष. आफ्रिकेचा संघ हा जागतिक अजिंक्यपद विजेता असल्याने त्यांच्याविरुद्ध भारताचा कस लागेल, याचा अंदाज होता.

या कसोटी मालिकेनंतर भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ लढतींची टी-२० मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून २०२६ मध्ये असेल. मात्र सध्या भारताची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण झाली असून त्यांच्यापुढे दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान होते.

आफ्रिकेचा संघ २०१९नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. त्यावेळी भारताने त्यांना ३-० अशी धूळ चारली होती. गतवर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे फलंदाज फिरकीविरुद्ध सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला ०-३ असा व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. आफ्रिकेच्या संघातही उत्तम असे फिरकीपटू आहेत. मात्र सोमवारी फलंदाजांना पोषक खेळपट्टी असूनही यान्सेनने बाऊन्सरचा अप्रतिम मारा करून आपल्या वेगवान गोलंदाजीने भारताची अवस्था बिकट केली.

रविवारच्या बिनबाद ९ धावांवरून पुढे खेळताना यशस्वी व के. एल. राहुल यांनी ६५ धावांची सलामी नोंदवली. केशव महाराजने राहुलला (२२) बाद करून ही जोडी फोडली. यशस्वीने ७ चौकार व १ षटकारासह कसोटीतील १३वे अर्धशतक साकारले. मात्र सायमन हार्मरने त्याचा अडसर दूर केला आणि तेथून भारताचा डाव घसरला. तिसऱ्या क्रमांकावरील साई सुदर्शन (१५) हार्मरचाच शिकार ठरला.

मग यान्सेनने ध्रुव जुरेल (०), पंत (७), रवींद्र जडेजा (६), नितीश रेड्डी (१०) यांना एकामागोमाग एक बाद करून मधली फळी गुंडाळली. विशेषत: पंत सोडून सर्वांना त्याने आखूड टप्प्याच्या चेंडूवर फसवले. १ बाद ९५ वरून भारताची ७ बाद १२२ अशी स्थिती झाल्याने भारतावर फॉलोऑनचे सावट निर्माण झाले. मात्र वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव या फिरकीपटूंच्या जोडीने प्रतिकार केला. यावेळी आठव्या स्थानी फलंदाजीस आलेल्या सुंदरने ९२ चेंडूंत ४८ धावा करतानाच कुलदीपसह (१३४ चेंडूंत १९ धावा) आठव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. कुलदीपने भारताकडून या डावात सर्वाधिक १३४ चेंडू खेळले, हे विशेष.

अखेरीस हार्मरने सुंदरला, तर यान्सेनने कुलदीप व जसप्रीत बुमराला माघारी पाठवून भारताचा डाव संपुष्टात आणला. यान्सेनने कसोटीत चौथ्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवले. हार्मरने ३, तर महाराजने १ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. आफ्रिकेला पहिल्या डावात २८८ धावांची आघाडी मिळाली. मात्र त्यांनी फॉलोऑन न लादता पुन्हा फलंदाजी करणे पसंत केले. त्यामुळे ते भारतासमोर आता मोठे लक्ष्य ठेवून मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन करण्याचा प्रयत्न करतील, असेच स्पष्ट झाले.

संक्षिप्त धावफलक

-दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : सर्व बाद ४८९

-भारत (पहिला डाव) : २०१

-दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ५ बाद २६० घोषित

-भारत (दुसरा डाव) : ६३.५ षटकांत सर्व बाद १४० (रवींद्र जडेजा ५४; सायमन हॉर्मर ६/३७)

logo
marathi.freepressjournal.in