

मुंबई : निवड समितीने भविष्याचा विचार करत कठोर निर्णय घेणे सुरूच ठेवले असून, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी विश्वचषक विजेत्या संघातील फलंदाज संजू सॅमसन याला भारतीय संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. भारत २३, २५ आणि २७ जुलै रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी२० सामने खेळणार आहे. निवड समितीच्या या दृष्टिकोनाचा फायदा वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि अशोक शर्मा यांना झाला असून, 'आयपीएल २०२६' मध्ये 'गुजरात टायटन्स' कडून प्रभावी कामगिरी केल्याबद्दल त्यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. नुकतेच अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे हा देखील १५ सदस्यांच्या टी२० संघात पहिल्यांदाच सामील झाला आहे.
सॅमसनच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज प्रभसिमरन सिंग याला संघात स्थान देण्यात आले आहे, ज्याने 'आयपीएल २०२६' मध्ये 'पंजाब किंग्स' कडून चांगली कामगिरी केली होती आणि तो २०२३ मधील हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघाचा भाग होता. सॅमसनला इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्याच्या अंतिम अकरा खेळाडूंमधून वगळून १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याला संधी देण्यात आली होती. सूर्यवंशी हा भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. सॅमसनला आयर्लंडविरुद्ध दोनदा आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सलग तीन अपयशांचा सामना करावा लागल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे.
बीसीसीआयने सॅमसनला वगळण्याचे कोणतेही अधिकृत कारण स्पष्ट केले नसले तरी, तो सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या अशा ६ खेळाडूंमध्ये सामील आहे ज्यांना संघात स्थान मिळालेले नाही. सॅमसन व्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांनाही संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. हर्षित, प्रसिद्ध आणि वॉशिंग्टन हे इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असल्याने ते झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नाहीत. रिंकू सिंग आणि मयांक यादव यांनी टी२० संघात पुनरागमन केले आहे.