भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात रांचीत झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि ध्रुव जुरेल यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताला विजयाचा सूर गवसला. पाच सामन्यांची मालिका ३-१ ने खिशात घातल्यानंतर कर्णधार रोहितने माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिलीय. "जुरेलकडे मोठे फटके खेळण्याचीही क्षमता होती, पण तरीही त्याने दुसऱ्या डावात खूप संयम दाखवला आणि त्याच्या. पहिल्या डावात जुरेलने ९० धावांची खेळी केल्यानं आम्ही इंग्लंडच्या एकूण धावसंख्येच्या जवळ आलो होतो. दुसऱ्या डावात तो खूप संयमाने खेळला, असं म्हणत रोहित शर्माने ध्रुव जुरेलवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, "या खेळाडूंसाठी इथपर्यंत पोहोचणं आणि जागा पक्की करणं इतकं सोपं नव्हतं. बाहेरुन खूप दबाव होता. खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या गेल्या. याबाबत चर्चाही झाली. पण अशाप्रकारची कामगिरी त्यांना भविष्यात उत्तम खेळाडू बनण्यासाठी प्रेरणा देत राहिल. आम्ही ३-१ ने पुढे आहोत आणि अजून एक सामना बाकी आहे. आम्ही शेवटचा कसोटी सामनाही जिंकू, अशी आशा आहे."
दुसऱ्या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने धडाकेबाज सुरुवात करून भारताला ८४ धावांपर्यंत पोहोचवलं होतं. परंतु, रोहित (५५), यशस्वी जैस्वाल (३७) धावांवर बाद झाल्यानंतर रजत पाटिदार (०), रविंद्र जडेजा (४) आणि सर्फराज खान (०) स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर शुबमन गिल आणि ध्रुव जुरेलच्या सावध खेळीमुळं भारताला या सामन्यात विजय संपादन करता आलं. शुबमनने १२४ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या, तर ध्रुव जुरेल ७७ चेंडूत ३९ धावांवर नाबाद राहिला.
इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ३५३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने ७३ धावा केल्या. परंतु, त्यानंतर फलंदाज बाद झाल्यानंतर संकटात सापडलेल्या भारसाठी ध्रुव जुरेलने ९० धावांची झुंझार खेळी साकारली. या धावांच्या जोरावर पहिल्या डावात भारताला सर्वबाद ३०७ धावांवर मजल मारता आली. त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची दुसऱ्या डावात दमछाक केली. इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी १४५ धावांवर गुंडाळलं. त्यामुळे इंग्लंडने भारताला विजयासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं होतं.