
नवी दिल्ली: आयपीएलच्या जेतेपदानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीचा बंगळुरूला मोठा फटका पडणार असल्याची चर्चा आहे. इंग्रजी वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार आगामी महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामने अन्य ठिकाणी खेळवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन कारणीभूत असल्याचे समजते.
भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांचा विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेतसुद्धा होतील. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत होतील. या विश्वचषकासाठी आता ५० दिवसांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असून एव्हाना अन्य सर्व स्टेडियमची तयारी पूर्ण झालेली आहे. तसेच तिकीट विक्रीला लवकरच प्रारंभ होणार आहे. भारतातील बंगळुरू, गुवाहाटी, इंदूर आणि विशाखापट्टणम येथे विश्वचषकाचे सामने होतील, तर श्रीलंकेमध्ये कोलंबो येथे लढतींचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातही बंगळुरूच्या चिन्नास्वामीत उपांत्य व अंतिम फेरीसह एकूण पाच लढती होणे अपेक्षित आहे. भारताचा श्रीलंकेविरुद्धचा उद्घाटनीय सामनाही येथेच होणार आहे.
मात्र बंगळुरूत जून महिन्यात चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून बीसीसीआय व आयसीसी केरळ राज्यातील थिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियममध्ये सामने स्थलांतरित करण्याच्या विचारात आहे. ज्या-ज्या राज्यांमध्ये विश्वचषकातील सामने होणार आहेत, त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलिसांकडून सुरक्षेचे हमीपत्र बीसीसीआयला सुपूर्द करायचे होते. मात्र कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला हे जमलेले नाही.
विराट कोहलीचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदा १८ वर्षांत प्रथमच आयपीएलचे जेतेपद मिळवले. ३ जून रोजी हा अंतिम सामना झाल्यानंतर ४ जून रोजी बंगळुरूतील विधानभवन ते चिन्नास्वामी स्टेडियम या मार्गात विजयी मिरवणूक काढण्यात येणार होती. मात्र स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी निर्माण झाली. यामध्ये ११ निष्पाप नागरिकांचा बळी गेला, तर ५० हून अधिक चाहते जखमी झाले. त्याचवेळी स्टेडियममध्ये कार्यक्रम सुरू होता. या मिरवणुकीसाठी सुरक्षाव्यवस्था पुरवण्याची क्षमता नसल्याचे बंगळुरूतील पोलिसांनी आधीच सांगितले होते. तसेच शासनाची परवानगी न घेतल्याचेही कर्नाटक सरकारने जाहीर केले. त्याशिवाय बंगळुरू संघाच्या मालकी चमूतील काही सदस्यांना अटकही करण्यात आले. तेव्हापासून चिन्नास्वामी स्टेडियम पूर्णपणे बंद आहे.
दरम्यान, आयसीसीच्या नियमांनुसार ज्या स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने होतात, ते स्टेडियम तयारीसाठी किमान ३० दिवसांपूर्वीच आयसीसीला सोपवणे गरजेचे असते. आता २५ सप्टेंबरपासून विश्वचषकातील सराव सामने सुरू होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला पुढील १० दिवसांत ग्रीनफील्ड स्टेडियमच्या नावावर शिक्कामोर्तब करून लागणार आहे. चिन्नास्वामीबाबतही निर्णय घ्यावा
तूर्तास, कर्नाटक क्रिकेटअसोसिएशनतर्फे म्हैसूर येथे महाराजा करंडक टी-२० स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील सामनेसुद्धा आधी चिन्नास्वामीत होणार होते. तसेच कर्नाटक असोसिएशनने स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपेक्षा २० टक्के कमी चाहत्यांसह सामन्याचे आयोजन करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयपुढे ठेवला आहे. मात्र बीसीसीआय याच्याशी सहमत नाही. त्यामुळेच चिन्नास्वामी स्टेडियमला विश्वचषकातील सामन्यांना मुकावे लागणार असून याविषयी अधिकृत घोषणा कधी करण्यात येईल, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
ग्रीनफील्ड नसल्यास ब्रेबॉर्नचा पर्याय
केरळमधील थिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर सध्या केरळ क्रिकेट लीगचे दुसरे पर्व सुरू होणार आहे. २१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. मात्र केरळ क्रिकेट असोसिएशनने ही स्पर्धा पूर्णपणे अन्य ठिकाणी खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ते ग्रीनफील्ड स्टेडियम विश्वचषकासाठी देऊ शकतात. जर तसे झाले नाही, तर बीसीसीआयपुढे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमचा पर्याय आहे. डब्ल्यूपीएल म्हणजेच महिलांच्या आयपीएलमधील सामने ब्रेबॉर्नवर आयोजित केले जातात. यंदा अंतिम सामना ब्रेबॉर्नवरच झाला. तसेच येथे चाहत्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभतो. मुख्य म्हणजे पुरुषांच्या क्रिकेटचा येथे आंतरराष्ट्रीय सामना होत नसल्याने, हे स्टेडियम पूर्णपणे महिला विश्वचषकासाठी दिले जाऊ शकते. मात्र पुढील १० दिवसांत बीसीसीआयला यासंबंधी निर्णय घ्यायचा आहे.
या ठिकाणी होणार आहेत सामने
बंगळुरू (चिन्नास्वामी स्टेडियम) : ५ सामने (उपांत्य, अंतिम फेरीसह)
गुवाहाटी (बारस्परा स्टेडियम) : ५ सामने (उपांत्य फेरीसह)
विशाखापट्टणम (व्हीडीसीए स्टेडियम) : ५ साखळी सामने
इंदूर (होळकर स्टेडियम) : ५ साखळी सामने
कोलंबो (प्रेमदासा स्टेडियम) : ११ साखळी सामने