

ठाणे : मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे इस्टेटमधील काही भागातील नागरिकांना गुरुवारी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या २० टक्के पाणी कपातीच्या निर्णयामुळे हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, १८ जून रोजी दुपारी १२:०० वाजल्यापासून ते शुक्रवार, १९ जून रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.
या कालावधीत पाणीपुरवठा पूर्ण बंद राहिल्यानंतर तो पुन्हा सुरू झाल्यावर पुढील १ ते २ दिवस नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.