भिवंडीत दुहेरी हत्याकांड; भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची कार्यालयात घुसून हत्या, भावाचाही घेतला बळी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात सोमवारी (दि.११) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. भाजप युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यांचा चुलत भावाची कंपनीच्या कार्यालयात घुसून धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली.
भिवंडीत दुहेरी हत्याकांड; भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची कार्यालयात घुसून हत्या, भावाचाही घेतला बळी
Published on

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात सोमवारी (दि.११) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यांच्या चुलत भावाची कंपनीच्या कार्यालयात घुसून धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटना कशी घडली?

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना खर्डी गावातील जेडीटी एंटरप्रायजेसच्या कार्यालयात घडली. या घटनेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (वय ४२) आणि त्यांचा भाऊ तेजस तांगडी (वय २२) यांची हत्या करण्यात आली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल, तेजस आणि त्यांचा सहकारी कार्यालयात बसले होते. त्याचवेळी अचानक ४ ते ५ हल्लेखोर कार्यालयात शिरले आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रफुल्ल आणि तेजस गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या पूर्वीही झाला होता हल्ला

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रफुल्ल तांगडी यांच्यावर याआधीही वर्षभरापूर्वी हल्ला झाला होता. मात्र, तेव्हा ते बचावले. प्राथमिक तपासात या हत्येमागे व्यावसायिक वैमनस्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीडितांच्या कुटुंबीयांनी काही व्यावसायिक सहकाऱ्यांची नावे संशयित म्हणून पोलिसांना दिली आहेत.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात नाकेबंदी केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोरांच्या शोधासाठी अनेक पथके तैनात केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमधून काही आरोपींचे स्पष्ट चित्रण मिळाले आहे.

या दुहेरी हत्याकांडामुळे खर्डी व आसपासच्या भागात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in