

शहापूर : शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा सतत मुक्त वावर सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे तीव्र वातावरण निर्माण झाले आहे. २१ एप्रिलला कलभोंडे गावातील १० वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी वारंवार निवेदने, तक्रारी व मागण्या करूनही संबंधित बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
डोळखांब परिसरातील अनेक आदिवासी व ग्रामीण कुटुंबांचा उदरनिर्वाह जंगलावर अवलंबून आहे. करवंदे, आंबे, आवळा, जांभूळ तसेच विविध वनउत्पादने गोळा करून विक्री केल्याने अनेक कुटुंबांचा संसार चालतो. मात्र बिबट्याच्या सततच्या भीतीमुळे नागरिक जंगलात जाण्यास धजावत नसल्याने अनेक कुटुंबांचा रोजगार पूर्णपणे ठप्प झाला असून आर्थिक संकट अधिक तीव्र झाले आहे.