

डोंबिवली : पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये एका तरुणाची चाकूने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारची जीवघेण्या हल्ल्याची घटना मध्य रेल्वे मार्गावर घडली आहे. अंबरनाथकडे जाणाऱ्या धावत्या लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले.
बुधवारी मध्यरात्री सुमारे ११.५२ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तिघेजण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटवाळा येथील प्रितेश कैलास कनोजिया (३१) हे घाटकोपरहून अंबरनाथकडे जाणाऱ्या धीम्या लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते. डबा रिकामा असल्याने ते सीटवर झोपले होते. डोंबिवली स्थानकात राजू गणेश वाघे (१९) आणि त्याचा मित्र साहिल खंदारे (१९) हे त्या डब्यात चढल्यानंतर वाघे याने कनोजिया यांना सीटवरून उठण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
वाद वाढल्यानंतर राजू वाघे याने हातातील लोखंडी कडे काढून कनोजिया यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर ठाकुर्ली स्थानकात तीन ते चार अज्ञात तरुण डब्यात चढले आणि त्यांनी कनोजिया, राजू वाघे आणि साहिल खंदारे या तिघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
तर अंबरनाथ घटनेप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यावेळी झालेल्या मारहाणीत प्रितेश कनोजिया आणि राजू वाघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले. कल्याण रेल्वे पोलिसांकडून दोन्ही जखमींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विरार लोकलमध्येही मारामारी
चर्चगेट-विरार लोकलमध्ये पुन्हा तरुणांमध्ये टोकाचा वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दृश्यांमध्ये काही प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसताहेत. त्यातील एका व्यक्तीकडून ‘मशीन काढ’ अशी धमकीवजा भाषाही ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. लोकल ट्रेनमधील हा वाद नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. लोकलमध्ये हाणामारीच्या वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम समोर आले आहे.
मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर विरारच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, तुलनेने लोकल गाड्या अपुऱ्या पडत असल्याने प्रचंड गर्दी होते. या गर्दीतून किरकोळ कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
रेल्वे प्रशासन म्हणते- तक्रार नाही
लोकल प्रवासादरम्यान अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी व्हायरल व्हिडिओची आणि संबंधित घटनेची पडताळणी व चौकशी सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.