

नवी दिल्ली : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. ३१) शोक व्यक्त केला. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, दुर्घटनेतील बचावकार्य अद्याप सुरू आहे.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, "महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात इमारत कोसळून जीवितहानी झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो."
बचावकार्य युद्धपातळीवर
गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेअकराच्या सुमारास भिवंडीतील गंगारामवाडी, भंडारी कंपाऊंड परिसरातील कोहिनूर अपार्टमेंटच्या 'बी' विंगचा काही भाग अचानक कोसळला. दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF), अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
मृतांचा आकडा ९ वर
या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता नऊवर पोहोचला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य अद्याप सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या घटनेस जबाबदार असणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक अनुभव
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजता परिसरात मोठा तडतडण्याचा आवाज झाला. काही क्षणांतच इमारतीचा मोठा भाग कोसळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. बचाव पथकांकडून ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध सुरू आहे.