

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे निकाल शुक्रवारी (दि. १६) सात निवडणूक कार्यालयांत जाहीर झाले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाने ७४ जागांवर विजय मिळवत महापालिकेवर पुन्हा एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. काँग्रेसला १३ जागा, शिवसेना (शिंदे गट) ला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले, तर एक जागा अपक्षाकडे गेली आहे.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, मीरा-भाईंदरमधील मतदारांनी भाजपवर पुन्हा स्पष्ट विश्वास व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये दोन वेळा मतांची फेरमोजणी करण्यात आली. अखेर भाजपाच्या कविता त्रिपाठी यांनी शिवसेनेच्या पूजा आमगावकर यांचा अवघ्या ८ मतांनी पराभव केला.
एकूणच, या निकालाने मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, विरोधी पक्षांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.
घराणेशाहीला जोरदार झटका
या निवडणुकीत मी, माझी पत्नी, माझा मुलगा अशा राजकारणाच्या समीकरणालाही मतदारांनी जोरदार धक्का दिला. दिघ्यात भाजपचे नवीन गवते, त्यांच्या पत्नी अपर्णा गवते व भावजयी दीपा गवते; ऐरोलीत भाजपचे अनंत सुतार व त्यांच्या पत्नी शशिकला सुतार; शिंदे गटाचे एम. के. मढवी यांच्या पत्नी विनया मढवी, सोमनाथ वास्कर यांच्या पत्नी कोमल वास्कर, रंगनाथ औटी यांच्या पत्नी शशिकला औटी, तसेच नामदेव भगत यांच्या पत्नी इंदुमती भगत यांना नागरिकांनी घरी बसवले.
नोटाचा ठसा निर्णायक
मीरा-भाईंदरमध्ये यंदा ‘नोटा’नेही निर्णायक भूमिका बजावली. विशेषतः भाईंदर पश्चिम भागात १,००० ते १,५०० मतदारांनी नोटाला मतदान केल्याने त्याचा थेट फायदा भाजप उमेदवारांना झाल्याचे दिसून आले.