

उल्हासनगर : मित्राला भेटण्यासाठी पहाटे घराबाहेर पडलेला प्रवास अखेरचा ठरला. उल्हासनगरहून दुचाकीवरून मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांचा वरप येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू गुप्ता आणि पवन गुप्ता हे दोघे बुधवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून वरप येथे मित्राला भेटण्यासाठी जात होते. वरप येथील हनुमान मंदिराजवळ पोहोचल्यावर त्यांनी समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट ट्रकच्या मागील चाकाखाली गेले.
अपघात इतका भीषण होता की, राजू गुप्ता आणि पवन गुप्ता या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता.
उल्हासनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोन कुटुंबांचा आधार हिरावून नेणाऱ्या या अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.