ढाका : बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागल्यानंतर झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) ३०० पैकी २१२ जागा पटकावत ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्यामुळे ‘बीएनपी’चे नेते तारिक रेहमान यांचा बांगलादेशचे नवे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेहमान येत्या शनिवारी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
स्थानिक दूरदर्शन आणि विविध वृत्तवाहिन्यांच्या दाव्यानुसार, ‘बीएनपी’ने बहुमत मिळविले असून सरकार स्थापन करणार असल्याचेही जाहीर केले आहे. ‘बीएनपी’ने ‘जमात-ए-इस्लामिक’ या पक्षाचा दारुण पराभव केला आहे. जमातला केवळ ७२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
रेहमान दोन जागांवर विजयी
‘बीएनपी’ला दणदणीत विजय मिळाल्यानंतर तारिक रेहमान हे देशाचे नवे पंतप्रधान होणार आहेत. लंडनमध्ये वास्तव्याला असलेले रेहमान जवळपास १७ वर्षांनंतर स्वदेशात परतले. त्यांनी ही निवडणूक लढवून ढाका-१७ आणि बोगुरा-६ या दोन्ही जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत एकूण ५० राजकीय पक्ष, १,७५५ उमेदवार आणि २७३ अपक्ष निवडणूक रिंगणात होते.
मोदींकडून अभिनंदन
निवडणुकीत निर्णायक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) नेते तारिक रेहमान यांचे अभिनंदन केले आणि भारत लोकशाहीवादी बांगलादेशला पाठिंबा देत राहील, असे प्रतिपादन केले. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, मोदींनी ‘बीएनपी’ला विजयाकडे नेल्याबद्दल रेहमान यांचे अभिनंदन केले. “बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत ‘बीएनपी’ला निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल मी तारिक रेहमान यांचे हार्दिक अभिनंदन करतो. हा विजय बांगलादेशातील जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवितो,” असे पंतप्रधान म्हणाले. भारत लोकशाही, प्रगतिशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील. आमचे बहुआयामी संबंध मजबूत करण्यासाठी आणि आमची समान विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, असे ते पुढे म्हणाले.
खालिदा झिया यांचे पुत्र
तारिक रेहमान हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र असून तब्बल ३५ वर्षांनंतर बांगलादेशाला पुरुष पंतप्रधान लाभणार आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना आणि खालिदा झिया यांनी १९९१ ते २०२४ पर्यंत देशाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवले. त्या दोघांनीही पंतप्रधान म्हणून काम पाहिले. २००८ मध्ये तारिक रेहमान यांना देश सोडून पळून जावे लागले होते. जवळजवळ १७ वर्षे निर्वासित राहिल्यानंतर ते २५ डिसेंबर २०२५ रोजी लंडनहून बांगलादेशला परतले. शेख हसीना सरकारने त्यांच्याविरुद्ध ८० हून अधिक खटले दाखल केले होते.