'तात्काळ देश सोडा'; इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट, भारत सरकारकडून महत्त्वाच्या सूचना 
आंतरराष्ट्रीय

'तात्काळ देश सोडा'; इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट, भारत सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

Travel Advisory : ही सूचना इराणमधील सर्व भारतीयांसाठी लागू असून त्यामध्ये विद्यार्थी, व्यावसायिक, भाविक आणि पर्यटक यांचाही समावेश आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला पुन्हा जारी केला आहे. तसेच सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीयांसाठी उपलब्ध वाहतूक सुविधांचा वापर करून शक्य तितक्या लवकर देश सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सोमवारी (दि.८) भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची प्रवास सूचना जारी केली. इराणचा कोणताही प्रवास टाळावा तसेच सध्या तेथे असलेल्या भारतीयांनी तातडीने सुरक्षितपणे देशाबाहेर पडावे, असे आवाहन भारताने पुन्हा केले आहे.

तेहरानमधील भारतीय दूतावासाने जारी केलेली ही आठवी अ‍ॅडव्हायजरी असून प्रदेशातील वाढत्या सुरक्षा चिंतेचा आणि घडामोडींचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे.

भारतीय दूतावासाची नागरिकांना सूचना

भारतीय दूतावासाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, "प्रदेशातील ताज्या घडामोडी लक्षात घेता, सर्व भारतीयांनी इराणचा कोणताही प्रवास टाळावा. तसेच सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी उपलब्ध वाहतूक साधनांचा वापर करून शक्य तितक्या लवकर देश सोडावा."

ही सूचना इराणमधील सर्व भारतीयांसाठी लागू असून त्यामध्ये विद्यार्थी, व्यावसायिक, भाविक आणि पर्यटक यांचाही समावेश आहे.

इस्रायल-इराण संघर्षामुळे वाढली चिंता

तेहरानकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्रायलने मध्य आणि पश्चिम इराणमधील लक्ष्यांवर हवाई हल्ले केल्याच्या वृत्तानंतर परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात संघर्ष तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारत सरकारने यापूर्वीही ७ एप्रिल रोजी खबरदारीचा इशारा जारी केला होता. त्यावेळी भारतीयांना किमान ४८ तास सुरक्षित स्थळीच राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर वाढली खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी हटवली नाही, तर "आज रात्री संपूर्ण जग उद्ध्वस्त होईल,” असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

यानंतर एप्रिलमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीयांना तात्पुरत्या शांततेचा फायदा घेत त्वरीत देश सोडण्याचा सल्लाही दिला होता.

अजूनही हजारो भारतीय इराणमध्ये

अधिकृत आकडेवारीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणमधील लक्ष्यांवर हल्ले झाल्यानंतर संघर्ष तीव्र झाला होता. त्यावेळी सुमारे ९,००० भारतीय नागरिक इराणमध्ये होते. त्यापैकी आतापर्यंत जवळपास १,८०० भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. मात्र, अद्याप सुमारे ७,५०० भारतीय नागरिक इराणमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai : दादरमध्ये BEST बसचा भीषण अपघात; एकामागोमाग एक वाहनांना दिली धडक; एकाचा मृत्यू, Video

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

मुंबई ‘मेट्रो-१’, १२ वर्षे, १२५ कोटी प्रवासी

५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेकडे रवाना; साडेसहा फूट उंच भव्य मूर्ती न्हावाशेवा बंदरातून परदेशी वारीला