संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) भारताने पाकिस्तानवर आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. “नरसंहाराला लष्करी कारवाईचे गोंडस नाव देऊन गुन्हेगारांचे पाप कधीही धुता येत नाही. निष्पाप नागरिकांची हत्या करणे, त्यांना अपंग करणे किंवा अनाथ करणे याला दहशतवादविरोधी मोहीम म्हणता येत नाही,” अशा कडक शब्दांत भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी, राजदूत हरीश पर्वथनेनी यांनी पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले. पाकिस्तानातर्फे अफगाणिस्तानच्या हद्दीत केल्या जाणाऱ्या लष्करी हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला. हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायदे, यूएन चार्टर आणि सार्वभौमत्वाच्या तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे.
पर्वथनेनी यांनी ‘युनायटेड नेशन्स असिस्टन्स मिशन इन अफगाणिस्तान’च्या अहवालाचा हवाला देत सांगितले की, या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच तब्बल ३७२ नागरिक मारले गेले असून ३९७ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांश बळी हे पवित्र रमझान महिन्यात घेण्यात आले.
डीप स्टेट
हा पाकिस्तानच्या ‘डीप स्टेट’ (लष्कर आणि गुप्तहेर संघटना) मधील द्वेषाच्या कारखान्यातून बाहेर पडलेला अजेंडा आहे. स्वतःची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, देशातील संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठी आणि जनतेचे लक्ष मुख्य राजकीय-आर्थिक संकटांवरून हटवण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना भारताच्या विरोधात कायमस्वरूपी शत्रुत्वाच्या छायेत ठेवण्याचा हा डाव आहे, असा घणाघात पर्वथनेनी यांनी केला.