नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडे येणारी एलपीजी वाहून नेणारी दोन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुखरूप बाहेर पडली आहेत. दुसरीकडे, या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या जलमार्गाजवळ एका भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला झाल्यामुळे ते बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
'सायमी' या एलपीजी टँकरने १३ मे रोजी ही सामुद्रधुनी ओलांडली, तर 'एनव्ही सनशाईन' हे जहाज गुरुवारी सुखरूप बाहेर पडले. दुसऱ्या एका घटनेत सोमालियाहून शारजाहकडे जात असलेल्या 'हाजी अली' या भारतीय लाकडी मालवाहू जहाजावर ओमानच्या सागरी हद्दीत बुधवारी पहाटे हल्ला झाला. या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली आणि ते समुद्रात बुडाले, अशी माहिती बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातर्फे देण्यात आली. जहाजावरील सर्व १४ खलाशांना ओमानच्या तटरक्षक दलाने वाचवले असून, त्यांना ओमानमधील दिब्बा बंदरात नेण्यात आले आहे.