बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक घरांमध्ये साधे, सात्विक आणि गोड जेवण बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी खीर-पुरीचा बेत विशेष मानला जातो. बौद्ध परंपरेनुसार, ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम बुद्धांना सुजाता नावाच्या एका स्त्रीने दूध आणि तांदळापासून बनवलेला गोड आहार अर्पण केला होता. या पौष्टिक आहारामुळेच त्यांना बोधीवृक्षाखाली ध्यान करण्याची शक्ती मिळाली आणि पुढे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, असे मानले जाते.
बौद्ध परंपरेत खीर ही केवळ गोड पदार्थ नसून साधेपणा, शुद्धता आणि समाधानाचे प्रतीक मानली जाते. दूध, धान्य आणि गोडवा यांचा साधा संगम असलेली खीर बुद्धांनी सांगितलेल्या 'मध्यम मार्गा'ची आठवण करून देते. खिरीचा पांढराशुभ्र रंग शांतता, निर्मळता आणि मन:शांतीचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच बुद्ध पौर्णिमेच्या जेवणात खिरीला विशेष स्थान दिले जाते.
यंदा १ मे ला साजऱ्या होणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला नेहमीच्या खिरीला थोडा शाही ट्विस्ट देत खजूर, केशर आणि ड्रायफ्रुट्स घालून तुम्ही सुगंधी, घट्ट आणि क्रीमी शेवई खीर तयार करू शकता. दुधाचा समृद्ध स्वाद, खजुराचा नैसर्गिक गोडवा आणि ड्रायफ्रुट्सचा कुरकुरीतपणा यामुळे ही खीर-पुरी बुद्ध पौर्णिमेसाठी अगदी परफेक्ट ठरते.
साहित्य :
शेवई खिरीसाठी
१ कप बारीक शेवई (भाजलेली)
१ लिटर फुल फॅट दूध
८ ते १० बिया काढलेले खजूर (चिरलेले)
२ मोठे चमचे साजूक तूप
८ ते १० बदाम (चिरलेले)
८ ते १० काजू (चिरलेले)
१ मोठा चमचा पिस्ता (चिरलेला)
१ मोठा चमचा मनुका
४ ते ५ चमचे साखर (चवीनुसार)
१/२ छोटा चमचा वेलची पूड
काही केशर काड्या
१ छोटा चमचा गुलाबपाणी
१ छोटा चमचा चारोळी (ऐच्छिक)
सुक्या गुलाब पाकळ्या (सजावटीसाठी, ऐच्छिक)
पुरीसाठी
२ कप गव्हाचे पीठ
१ मोठा चमचा रवा
१ छोटा चमचा साजूक तूप
चिमूटभर मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
तळण्यासाठी तेल
कृती :
शेवई खीर कशी बनवावी?
सर्वप्रथम कढईत साजूक तूप गरम करून त्यात शेवई हलक्या आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. शेवईचा रंग हलका बदलला की त्यात चिरलेले काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका घालून एक मिनिट परतून घ्या.
दुसऱ्या भांड्यात फुल फॅट दूध गरम करून मंद आचेवर थोडे आटवून घ्या. दूध किंचित घट्ट झाले की त्यात भाजलेली शेवई आणि ड्रायफ्रुट्सचे मिश्रण घाला.
आता त्यात चिरलेले खजूर घालून मंद आचेवर शिजू द्या. खजुरामुळे खिरीला नैसर्गिक गोडवा आणि छान टेक्स्चर मिळते. शेवई मऊ झाली की त्यात साखर, वेलची पूड आणि केशर घाला.
सर्व साहित्य एकजीव झाल्यावर गॅस बंद करून त्यात गुलाबपाणी आणि चारोळी घाला. खीर थोडी घट्टसर झाली की सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
पुरी कशी बनवावी?
एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, मीठ आणि तूप घालून चांगले मिसळा. त्यात थोडे-थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. १५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर लहान गोळे करून छोट्या पुर्या लाटा आणि गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम पुरीसोबत सुगंधी शेवई खीर सर्व्ह करा.
टिप्स :
खजूर आधी कोमट दुधात भिजवून घातल्यास खीर स्वादिष्ट लागते.
फुल फॅट दूध वापरल्यास खीर घट्ट आणि क्रीमी बनते.
खीर खूप पातळ वाटत असल्यास थोडा वेळ अधिक आटवा.
साखर कमी ठेवून खजुराचा नैसर्गिक गोडवा वाढवू शकता.
खीर गरम आणि थंड अशा दोन्ही प्रकारे चविष्ट लागते.
सर्व्ह करताना वरून केशर, पिस्ता आणि सुकलेल्या गुलाब पाकळ्या घातल्यास अधिक आकर्षक दिसते.