चैत्र नवरात्र हा अत्यंत पवित्र सण मानला जातो. यंदा १९ मार्चपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून २७ मार्चला रामनवमीने त्याची सांगता होणार आहे. या नऊ दिवसांत भक्त देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा करतात आणि उपवास पाळतात. या काळात सात्त्विक आहार घेणे महत्त्वाचे मानले जाते.
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी नवरात्रीत शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी काही सुपरफूड्स सुचवले आहेत.
ड्रायफ्रूट्स
दररोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते. काजू मज्जासंस्थेसाठी, बदाम त्वचेसाठी, अक्रोड हार्मोन्ससाठी आणि डोळ्यांसाठी पिस्ता फायदेशीर ठरतो.
राजगिरा
राजगिरा पचन सुधारण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देण्यास मदत करतो. त्यामुळे उपवासात हा उत्तम पर्याय आहे.
सुरण, अरबी आणि रताळे
सुरण, अरबी, रताळे यांसारखे कंदमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तसेच हे पदार्थ नैसर्गिकरीत्या उष्णतेचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
ताज्या फळांचा रस प्या
ताज्या फळांच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि थकवा कमी होतो.
कडुलिंबाची चटणी
कडुलिंबाची चटणी ही शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करते. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
दूध आणि दही फायदेशीर
दूध आणि दही हे पचनसंस्था, हृदय आणि मेंदूसाठी उपयुक्त असतात. त्यामुळे उपवासात त्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
आंबे डाळ
आंबे डाळ हा कच्च्या आंब्याचा आणि डाळीचा संगम असलेला पदार्थ आहे. यात फायबर, खनिजे आणि चव यांचा उत्तम समतोल असतो.