काश्मिरी कहावा हा चहा, कॉफी तसेच ग्रीन टीला पर्याय आहे. हा एक प्रकारचा काश्मिरी चहा आहे. काश्मीर हे थंड हवेचे ठिकाण असून येथे बर्फवृष्टी होत असते. त्यामुळे वेगवेगळ्या मसाल्यांचा काश्मिरी कहावा बनवताना उपयोग केला जातो. मात्र, काश्मिरी कहाव्याचे खास आकर्षण म्हणजे काश्मीरच्या केसरचे असते. या चहामध्ये केल्या जाणाऱ्या काश्मिरी केसरच्या वापरामुळे याला खूप वेगळी चव येते. तसेच साखर किंवा गुळा ऐवजी यामध्ये गोडपणा आणण्यासाठी मधाचा वापर केला जातो.
काश्मिरी कहाव्यात खास ११ मसाल्यांचा वापर केला जातो. या वैशिष्ट्यांमुळे काश्मिरी कहावाचे आकर्षण वाढले आहे. थंडीच्या दिवसात काश्मिरी कहावा पिणे खूपच लाभदायक ठरते. बाजारात काश्मिरी कहावाचा मसाला मिळतो. मात्र, घरातही तुम्ही हा कहावा बनवू शकता.
काश्मिरी कहावा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
काश्मिरी ग्रीन टी
बारीक चिरलेले बदाम
दालचिनी
लवंग
काळी मिरी
सुके आले
बनशका किंवा बनाश्का
हिरवी वेलची
बडीशेप
वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
केशर
काश्मिरी कहावा बनवण्याची कृती
काश्मिरी कहावा बनवण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र, सामान्यपणे पुढील पद्धत वापरली जाते. कहावा बनवण्यासाठी, पातेल्यात १ ग्लास पाणी घाला. आता त्यात बारीक चिरलेले बदाम घाला. १ ते २ दालचिनीच्या काड्या घाला. १ लवंग आणि २ ते ३ काळी मिरी घाला. यानंतर त्यात थोडे कोरडे आले पावडर घाला. नंतर १ चमचा बडीशेप घाला. यानंतर त्यात ३ ते ४ हिरव्या वेलची आणि थोडासा बनशका घाला. त्यानंतर वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, केशर आणि काश्मिरी ग्रीन टी घालून चांगले उकळा. चहा काही वेळ उकळू द्या आणि गाळून घ्या. गोडवा येण्यासाठी मध घाला आणि नंतर याचे सेवन करा.
काश्मिरी कहावा पिण्याचे फायदे
हा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे आणि अनेक आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत करू शकतो. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीर अनेक गंभीर आजारांपासून सुरक्षित राहते. याशिवाय, या चहामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे मज्जातंतूंच्या आजारांना प्रतिबंधित करण्यास देखील उपयुक्त आहेत. एवढेच नाही तर ते अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी देखील समृद्ध आहे जे तुम्हाला अनेक हंगामी संसर्गांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)