कारल्याची भाजी म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात. कारण त्याचा कडवट स्वाद अनेकांना आवडत नाही. मात्र, योग्य पद्धतीने कारलं तयार केलं तर त्याची भाजी चविष्ट, खमंग आणि अजिबात कडू न लागणारी बनू शकते. काही छोट्या किचन ट्रिक्स वापरून कारल्याचा कडूपणा सहज कमी करता येतो.
प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. या ट्रिक्स वापरल्यास कारल्याची भाजी अधिक स्वादिष्ट होऊ शकते.
मीठ लावून ठेवा
कारलं चिरल्यानंतर त्याला थोडंसं मीठ लावून १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. यामुळे कारल्यातील अतिरिक्त पाणी बाहेर पडतं आणि कडवटपणा कमी होण्यास मदत होते.
यानंतर कारल्याच्या फोडी हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाका आणि मग भाजी बनवा.
बिया पूर्णपणे काढून टाका
कारल्यातील बियांमुळेही कडूपणा वाढतो. त्यामुळे कारलं चिरताना त्यातील बिया व्यवस्थित काढून टाकाव्यात.
यामुळे भाजीची चव अधिक संतुलित राहते.
व्हिनेगरच्या पाण्याचा वापर करा
कारल्याच्या फोडी काही वेळ व्हिनेगरच्या पाण्यात भिजत ठेवल्यास त्याचा कडूपणा कमी होऊ शकतो.
यासाठी १ लिटर पाण्यात २ चमचे व्हिनेगर मिसळून त्यात कारल्याच्या फोडी काही वेळ ठेवा.
ताकामध्ये भिजवून ठेवा
आंबट दह्याचं पातळ ताक करून त्यात कारल्याच्या फोडी अर्धा तास भिजवून ठेवा.
यानंतर केलेली भाजी कमी कडू लागते आणि त्याला दह्याचा हलका स्वादही येतो.
साखर आणि मिठाचं पाणीही फायदेशीर
१ लिटर पाण्यात १ चमचा साखर आणि १ टीस्पून मीठ मिसळा. या पाण्यात कारल्याच्या फोडी १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवल्यास कडूपणा कमी होण्यास मदत होते.
योग्य पद्धतीने कारलं तयार केल्यास त्याची भाजी केवळ पौष्टिकच नाही तर चविष्टही होऊ शकते.