भारतीय जेवणात लोणच्याला विशेष स्थान आहे. साध्या जेवणालाही लोणच्यामुळे वेगळी चव मिळते. पराठा, पुलाव, चिल्ला किंवा रोजच्या जेवणासोबत लोणचं असलं की जेवण अधिक रुचकर वाटतं. बाजारात विविध प्रकारची लोणची सहज मिळतात, मात्र उन्हाळ्यात बनवलं जाणारं आंब्याचं लोणचं आजही अनेक घरांमध्ये खास आवडीने तयार केलं जातं. योग्य पद्धतीने बनवल्यास हे लोणचं वर्षानुवर्षे टिकू शकतं. मात्र त्यासाठी योग्य आंबा निवडणं आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.
लोणच्यासाठी योग्य आंबा कसा निवडावा?
आंब्याचं लोणचं चविष्ट होण्यासाठी योग्य प्रकारचा आंबा निवडणं खूप महत्त्वाचं आहे. तोतापुरी, रामकेला आणि राजापुरी हे आंबे लोणच्यासाठी उत्तम मानले जातात. या आंब्यांचा गर घट्ट आणि कमी तंतुमय असतो. त्यांची नैसर्गिक आंबट चव मसाल्यासोबत छान मिसळते. खूप मऊ वाटणारे किंवा पिवळे डाग असलेले आंबे घेणं टाळावं. असे आंबे लवकर खराब होण्याची शक्यता असते.
आंबा घेताना 'या' गोष्टी तपासा
आंबा हाताने हलकेच दाबून पाहा. खूप घट्ट आंबे लोणच्यासाठी योग्य असतात.
देठाजवळ कुठे रस गळत नाही ना किंवा वास येत नाही ना, हे तपासा.
आंब्याची साल गडद हिरवी आणि गुळगुळीत असावी.
कापलेले, तडे गेलेले किंवा डाग असलेले आंबे घेऊ नयेत. त्यामुळे बुरशी येण्याचा धोका वाढतो.
लोणचं बनवताना ओलावा टाळा
आंबे नीट धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्यानंतर ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या. शक्य असल्यास उन्हात किंवा फॅनखाली वाळवा. थोडाही ओलावा राहिला तरी लोणचं लवकर खराब होऊ शकतं.
मोहरीचं तेल वापरताना घ्या काळजी
भारतीय लोणच्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने मोहरीचं तेल वापरलं जातं. तेल आधी चांगलं गरम करून घ्यावं. त्याला थोडासा धूर येऊ द्यावा आणि नंतर पूर्ण थंड झाल्यावरच लोणच्यात वापरावं. त्यामुळे तेलाचा कच्चा वास कमी होतो.
मीठ आणि हळद का महत्त्वाची?
आंब्याचे तुकडे मीठ आणि हळद लावून १ ते २ दिवस उन्हात ठेवावेत. यामुळे अतिरिक्त ओलावा निघून जातो आणि लोणचं अधिक काळ टिकण्यास मदत होते.
लोणचं साठवताना काळजी घ्या
लोणचं नेहमी स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या किंवा मातीच्या बरणीतच ठेवावं. बरणी वापरण्यापूर्वी ती उन्हात चांगली वाळवणं महत्त्वाचं आहे.
तेलात पूर्ण बुडालेलं असावं लोणचं
लोणचं नेहमी तेलात पूर्ण बुडालेलं असणं गरजेचं आहे. तेल नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि लोणचं खराब होण्यापासून वाचवतं. योग्य आंबा निवडण्यापासून ते साठवणुकीपर्यंत प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली, तर घरचं आंब्याचं लोणचं अधिक चविष्ट आणि टिकाऊ बनू शकतं.