दही जास्त आंबट झालंय? फेकू नका, 'असा' करा वापर 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

दही जास्त आंबट झालंय? फेकू नका, 'असा' करा वापर

दही आंबट झालं म्हणून फेकून देऊ नका. दह्याचा आंबटपणा कमी करण्याच्या सोप्या ट्रिक्स जाणून घ्या आणि या दह्यापासून कढी, ढोकळा, रायता यांसह विविध पदार्थ कसे करता येतील ते पाहा.

Mayuri Gawade

दही ताजं असताना त्याची चव मस्त लागते. मात्र काही वेळ जास्त ठेवलं की त्याला आंबटपणा येतो आणि मग ते खावंसं वाटत नाही. पण दह्याला फक्त आंबट चव आली असेल आणि ते खराब झालेलं नसेल, तर ते फेकून देण्याची गरज नाही. काही सोप्या उपायांनी त्याची चव सौम्य करता येते. एवढंच नाही, तर या दह्याचा वापर अनेक पदार्थांमध्येही करता येतो.

दह्यावरचं पाणी आधी काढा

दह्याच्या वर पाणी साचलं असेल तर ते चमच्याने दह्यात मिसळण्याऐवजी अलगद ओतून काढा. त्यानंतर त्यात थोडं साधं पाणी घालून पुन्हा वर आलेलं पाणी काढून टाकता येतं. यामुळे दह्याचा आंबटपणा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.

थोडी साखरही ठरते उपयोगी

दही फार आंबट नसेल तर त्यात अगदी थोडी साखर घालून फेटा. यामुळे चवीतील आंबटपणा बॅलन्स होतो. विशेषतः दहीभात, लस्सी किंवा गोड पदार्थांसाठी ही युक्ती उपयोगी ठरू शकते. मात्र साखर जास्त प्रमाणात घालू नका.

दुधासोबत मिसळून पाहा

आंबट दह्याची चव सौम्य करण्यासाठी त्यात थोडं ताजं आणि थंड दूध मिसळून फेटू शकता. हे मिश्रण तयार केल्यानंतर लगेच वापरणं चांगलं. दहीभात किंवा इतर पदार्थांमध्ये याचा वापर करता येतो.

कढीसाठी आंबट दही एकदम योग्य

दही थोडं आंबट झालं असेल तर त्यापासून कढी करता येते. दह्यात बेसन आणि पाणी घालून मिश्रण तयार करा. त्यात हळद, मीठ आणि चवीनुसार थोडी साखर घाला. फोडणी दिल्यानंतर तयार होणारी आंबटसर कढी भातासोबत छान लागते.

ढोकळा, इडली आणि डोशाच्या पिठासाठीही वापरता येईल

आंबट दह्याचा वापर काही पदार्थांच्या पिठातही करता येतो. ढोकळा, इडली, डोसा किंवा उत्तप्याच्या पिठात दही घातल्याने त्याला हलकी आंबूस चव येते. त्यामुळे दही जास्त आंबट झालं असेल तरी योग्य पदार्थ निवडून त्याचा वापर करता येतो.

भजी, धिरडी किंवा चटणीतही वापर

बेसनाच्या पिठात आंबट दही, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून भजी किंवा धिरडी करता येतात. चटणी किंवा इतर पदार्थांमध्येही प्रमाणानुसार आंबट दह्याचा वापर करता येतो.

रायत्याची चवही करता येईल बॅलन्स

काकडी, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून आंबट दह्याचा रायता करता येतो. दही जास्त आंबट वाटत असेल तर त्यात थोडी साखर आणि भाजलेली जिरेपूड घातल्याने चव संतुलित होण्यास मदत होते.

पराठा आणि थालीपीठाचं पीठही होईल मऊ

पराठा किंवा थालीपीठाच्या पिठात आंबट दही घातल्याने पीठ मऊ राहण्यास मदत होते. त्यामुळे उरलेलं दही वापरण्याचा हा आणखी एक सोपा पर्याय आहे.

मात्र हे लक्षात ठेवा!

दही फक्त चवीला आंबट झालं असेल तरच या उपायांचा विचार करा. दह्याला दुर्गंधी येत असेल, बुरशी दिसत असेल, रंग बदलला असेल किंवा पोत चिकट व असामान्य झाला असेल, तर ते वापरू नका. अशा वेळी दही फेकून देणंच योग्य आहे.

म्हणजेच, फक्त आंबट झालेलं दही लगेच फेकून देण्याची गरज नाही. योग्य पद्धतीने त्याची चव संतुलित करून किंवा योग्य पदार्थात वापरून त्याचा उपयोग करता येऊ शकतो.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन