मुंबई : प्राप्तिकर कर भरणारे ९४ हजार तसेच अन्य कारणांमुळे अपात्र ठरलेले ४६ हजार असे एकूण १ लाख ४० हजार शेतकरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. तसेच राज्यातील १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यात येत्या दोन दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आतापर्यंत एकूण १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी ११ लाख ४६ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्जांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी जिल्हा, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँकांकडून माहिती मागवून ३२ लाख शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. या यादीची केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी करण्यात आली. त्यात आयकर भरणा करणारे ९४ हजार शेतकरी असल्याचे आढळून आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
अपात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली
तसेच अन्य कारणांमुळे ४६ हजार शेतकरी हे कर्जमुक्ती योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. या सर्वांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. आतापर्यंत जारी करण्यात आलेल्या १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ७ लाख ३ हजार शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे तर ९ लाख ९३ हजार शेतकरी हे व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार आहेत. विविध तांत्रिक चुकांच्या दुरूस्तीसाठी १३ लाख शेतकऱ्यांची यादी बँकांकडे परत पाठविण्यात आली असून लवकरच या यादीत दुरूस्ती केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.