पुणे : महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा विसरून सामान्य माणसाचा अपेक्षाभंग केला असून राज्यात भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली आहे, अशी टीका करत आम आदमी पार्टी (आप) ने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
'आप'चे प्रभारी आणि दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिल्ली आणि पंजाबमधील विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात राबवून शाळा, दवाखाने, वाहतूक आणि रोजगाराचे सक्षमीकरण करणे हे पक्षाचे मुख्य धोरण असेल.
या पत्रकार परिषदेला राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे आणि पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविराज काळे उपस्थित होते. जरवाल म्हणाले की, आज कोणता नेता कोणासोबत आहे हे ओळखणे कठीण झाले आहे. निवडून आलेले अनेक नगरसेवक कोट्यधीश झाले, पण विकासाची गंगा सामान्य माणसापर्यंत पोहोचलेली नाही. या पार्श्वभूमीवर 'आप' प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहे.
निवडणुकीसाठी 'आप'ने आपली स्टार प्रचारक यादी जाहीर केली असून, यात राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, माजी मुख्यमंत्री अतिशी, खासदार संजय सिंग आणि राखी बिडलान यांचा समावेश आहे. हे सर्व नेते लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन प्रचार करतील.
पुणे महानगरपालिकेसाठी पक्षाने १६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण ४१ उमेदवारांची नावे जाहीर करून 'आप'ने इतर पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या यादीत :आलिशा मुलानी, स्मिता सोंडे, माधुरी वडमारे, सचिन कंकाळ, अनिकेत गागडे, स्वप्नील गोरे, अरुण शिंदे, इरफान रोड्डे, शेखर ढगे, इक्बाल तांबोळी, पियूष हिंगणे, सुरज सोनवणे, प्रदीप उदागे, प्रतीक खोपडे, मालन नाडे आणि निखिल खंदारे. उमेदवारी देताना महिला, अनुसूचित जाती आणि सर्वसामान्य प्रवर्ग यांचा समतोल राखण्यात आला आहे.
महाराष्ट्रात यशाचे पहिले पाऊल
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरपरिषद निवडणुकीत 'आप'च्या उमेदवार शालिनीताई सुखधान निवडून आल्याने पक्षाने महाराष्ट्रात स्वतःचे यश खाते उघडले, असे पक्षाचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी नमूद केले. या यशानंतर आता सर्व महानगरपालिका ताकदीने लढवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.