मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) ‘गुटखामुक्त महाराष्ट्र’ मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत राज्यभरात करण्यात आलेल्या कारवाईत गुटखा, पानमसाला विक्रेत्यांना लक्ष्य करण्यात आले असून १९५ ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत १९२ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरातून सुमारे १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ कोटींचा गुटखा, पानमसाल्याचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर धाराशीव, धुळे, नांदेड, पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी धाडसत्र हाती घेत मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये धाराशीव येथील परांडा येथे करण्यात आलेल्या कारवाईत १ कोटी दोन लाख ६७ हजारांचा साठा जप्त करण्यात आला.
समृद्धी महामार्गावर सावंगी टोलनाका येथे घालण्यात आलेल्या धाडीत ६० लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र - तेलंगणा सीमा भाग, नांदेड, येथे करण्यात आलेल्या कारवाईत १७ लाख ५२ हजार रुपये किमतीचा माल आणि वाहने जप्त करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड येथील मोशी येथे करण्यात आलेल्या कारवाईत ६ लाख १९ हजारांचा माल जप्त करण्यात आला असून ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.