पुणे : दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण होऊनही या प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. तपास यंत्रणांकडून होत असलेल्या विलंबामुळे पवार कुटुंबीयांसह बारामतीकरांमध्ये नाराजी पसरली असून, आता आमचा संयम सुटत चालला आहे, अशा शब्दांत युगेंद्र पवार यांनी तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुर्घटनेचे सत्य समोर येणे हा बारामतीकरांचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी अंतिम अहवाल तातडीने जाहीर करण्याची मागणी केली.
युगेंद्र पवार म्हणाले, “अजितदादांना जाऊन आज सहा महिने पूर्ण झाले; मात्र हा काळ कसा गेला, हे आम्हाला समजलेच नाही. दुर्घटनेच्या पहिल्या दिवसापासून आमची एकच मागणी आहे की, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी.” प्रशासनाने पहिल्या महिन्यात सादर केलेला प्राथमिक अहवाल मान्य नसून, त्यातील अनेक मुद्दे चुकीचे व वस्तुस्थितीला धरून नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सीआयडी, डीजीसीए आणि इतर तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करीत असताना अंतिम अहवालास इतका विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील भेटीबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, शरद पवार हे देशातील अनुभवी नेत्यांपैकी एक असून, पंतप्रधानही त्यांच्या अनुभवाचा आदर करतात.