महाराष्ट्र

अमरावतीत हृदयद्रावक घटना; दुसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून छळ; महिला आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

अमरावती शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्यांदा मुलीचा जन्म झाल्यामुळे सासरच्या लोकांकडून मानसिक छळ सहन करणाऱ्या ३२ वर्षीय महिला आरोग्य अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नेहा जाधव - तांबे

अमरावती शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्यांदा मुलीचा जन्म झाल्यामुळे सासरच्या लोकांकडून मानसिक छळ सहन करणाऱ्या ३२ वर्षीय महिला आरोग्य अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव शुभांगी निलेश तायवडे असून ती सीएचओ (समुदाय आरोग्य अधिकारी) म्हणून कार्यरत होती.

ही दुर्दैवी घटना अमरावतीच्या तपोवन संकुलातील जयभोले कॉलनीत रविवारी (२५ मे) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. शुभांगी मूळची नागपूरची असून तिचा विवाह नोव्हेंबर २०११ मध्ये नीलेश तायवडे (वय ३५) या बँक मॅनेजरशी झाला होता. शुभांगीला दोन मुली आहेत. त्यापैकी धाकटी मुलगी फक्त १३ महिन्यांची आहे.

शुभांगीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, दुसऱ्यांदा मुलगी झाल्यापासून शुभांगीवर तिचा पती नीलेश, सासू, दीर, नणंद आणि पतीचा एक मित्र सतत टोमणे मारत होते. घरात तिचा मानसिक छळ होत होता. या त्रासाला कंटाळून शुभांगीने राहत्या घरी मुलींच्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच शुभांगीचे वडील राजेंद्र तुरकाणे (वय ६५, रा. नागपूर) यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती नीलेश तायवडे, ७० वर्षीय सासू, नीलेशचा भाऊ नितीन तायवडे (वय ३८), वहिनी हातुर्ना (वय ४५) आणि नितीनचा मित्र नयन रामटेके यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आत्महत्येच्या एक दिवस आधी, २४ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता शुभांगीने तिच्या वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. त्या संवादात तिने तिला सासरी होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल सांगितले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. शुभांगीचे कुटुंबीय पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिच्या वडिलांनी जावयाने लेकीचा खून केला असल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणाचा तपास गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शुभांगीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, समाजातील स्त्रीभ्रूणभेद आणि मुलींच्या जन्माविषयी असणारी नकारात्मक मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि दोन निष्पाप मुलींचे भविष्य सुरक्षित राहावे, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन